मुंबई- राज्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात विदर्भाव्यतिरिक्त बहुतेक भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला पावसाचे विघ्न नसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाने जोर धरला आहे. उद्यापासून विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. १ जून २०२४ ते ११ सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात एकूण १०६८.६ मिमी पाऊस झाला आहे.
