मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांकडून हार-नारळ अर्पण करण्यास मनाई! सुरक्षा कारणास्तव मोठा निर्णय

Siddhivinayak Temple

Siddhivinayak Temple | मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव,भाविकांना मंदिरात हार, नारळ आणि इतर कोणत्याही प्रकारचा प्रसाद अर्पण करण्यास मनाई करण्यात आली आहे. 11 मे पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे विश्वस्त आणि अध्यक्षांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणांकडून धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याची सूचना मिळाली आहे. सिद्धिविनायक मंदिर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर राहिले आहे आणि येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नारळ, फुलमाळा आणि इतर नैवेद्य अर्पण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मंदिर ट्रस्ट श्री गणेशाचे आवडते दुर्वा आणि जास्वंदीची फुले भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, मंदिराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी २० माजी सशस्त्र दलातील जवानांची भरती केली जाणार आहे आणि ते शस्त्रसज्ज असतील, असेही सांगण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाने मंदिराबाहेरील फुलविक्रेत्यांशी चर्चा केली असून, त्यांनी आपला विद्यमान साठा संपवण्यासाठी ११ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विनंती मान्य केली होती. भाविकांची सुरक्षा ही पोलीस आणि मंदिर ट्रस्ट दोघांचीही जबाबदारी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.