‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ यशस्वी! 31 नक्षलवादी ठार, अमित शाह म्हणाले…

Anti-Naxal operations in Karregutta hills |

Anti-Naxal operations in Karregutta hills | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील कर्रगुट्टलू डोंगरात (Karreguttalu Hills) सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा (Naxalites) खात्मा करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत मोठे यश मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ही कारवाई ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ (Operation Black Forest) अंतर्गत राबवण्यात आली असून, ती आतापर्यंतची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई ठरली आहे.

गृहमंत्र्यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत लिहिले की, “#नक्षलमुक्त भारत संकल्पात ऐतिहासिक यश – सुरक्षा दलांनी कर्रगुट्टलू डोंगरात 31 नक्षलवाद्यांना ठार करत लाल दहशतीच्या ठिकाणी तिरंगा फडकवला.” त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), विशेष कृती दल (STF) आणि जिल्हा राखीव रक्षक (DRG) यांच्या शौर्याचे कौतुक करत, ही कारवाई 21 दिवसांत कोणतीही जीवितहानी न होता यशस्वी झाल्याचे सांगितले.

नक्षलवाद्यांचे गड उद्ध्वस्त

कर्रगुट्टलू डोंगर हा नक्षलवाद्यांच्या अनेक संघटनांचे एकत्रित तळ मानला जात होता. यामध्ये पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA), डीकेएसझेडसी, टीएससी आणि सीआरसी यांचा समावेश होता. हा डोंगर प्रशिक्षण, शस्त्रास्त्र निर्मिती आणि रणनीती आखणीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जात होता.

शाह म्हणाले, “ज्या डोंगरावर एकेकाळी लाल दहशत होती, तिथं आज तिरंगा अभिमानाने फडकतोय.” ही कारवाई केवळ सामरिक नव्हे, तर मानसिक विजयाचेही प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टची माहिती

सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह (Gyanendra Pratap Singh) यांनी सांगितले की, 31 मृतदेहांपैकी 28 जणांची ओळख पटली असून उर्वरितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या कारवाईत कोब्रा युनिट, सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांचा समावेश होता. गुप्तचर अहवालानुसार, आणखी काही नक्षलवादी या मोहिमेत मारले गेले असण्याची शक्यता आहे.

2026 पर्यंत नक्षलमुक्त भारताचे उद्दिष्ट

शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवाद्यांच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्याचे लक्ष्य आहे. “या कारवाईत एका जवानाचाही मृत्यू न झाल्याचा मला अभिमान आहे. देशभरातील जनतेला आपल्या सुरक्षाबलांचा अभिमान वाटतो,” असे ते म्हणाले.