मुंबई – मोदी सरकार घरोघरी सिंदूर पाठवून ऑपरेशन सिंदूरचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. ते हे करत असतील तर त्या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरेही मोदी यांनी द्यावीत. असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी होणे हे आपल्या सैन्याचे यश आहे. त्याचे श्रेय मोदी घेत आहेत. ते घरोघरी सिंदूर पोहोचवत आहेत. पण सैन्याने केलेल्या पराक्रमानंतर ट्रम्प यांच्या दबावामुळे मोदींनी युद्धबंदी का केली? भारत आतापर्यंत कोणाच्याही दबावापुढे झुकला नव्हता. तुम्ही झुकलात. याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. युद्धबंदीसाठी त्यांनी संसदेची परवानगी घेतली होती का? या युद्धबंदीमुळे आज जगात या महान भारतीय देशाची प्रतिमा मलीन होत आहे. आतापर्यंत ट्र्म्प एकटेच म्हणत होते की त्यांनी युद्ध थांबवले. आता तर पुतीन यांनीही त्यांचीच री ओढली आहे. सरकारने सर्व जगात आपले प्रतिनिधी पाठवले हे चांगले झाले तरी त्याचा म्हणावा तितका फायदा झाला नाही. आमचे प्रतिनिधी २७ मे रोजी कुवेतला गेले होते तर २८ मे रोजी कुवेतने पाकिस्तानच्या व्हिसावरची १९ वर्षांपासूनची बंदी हटवली. पाकिस्तानला जागतिक व आशियाई पातळीवर अर्थसहाय्य मिळत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद विरोधी समितीचे उपाध्यक्षपद दिले जात आहे. जी-७ देशांच्या परिषदेला आम्हाला बोलावले जात नाही. मोदींनीही तिथे न जाण्याचे ठरवले आहे. ट्रम्प यांनी उद्या जर या व्यासपीठावरून मी युद्ध थांबवले, असे म्हटले तर त्यांना मोदी थांबवू शकत नाहीत. मोदी यांनी किमान सर्वपक्षीय बैठक घ्यावी व आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आपले परराष्ट्र धोरण अयशस्वी होत असल्याबद्दल जयशंकर यांनी तर आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.