बिहारात सरकार आल्यास आरक्षण मर्यादा हटवणार

राहुल गांधीची ग्वाही


नालंदा -जातीनिहाय जनगणना हा भारतीय समाजाचा एक्सरे असून त्यामुळे समाजात कोणाची किती लोकसंख्या व नेमकी भागीदारी किती आहे हे कळते.आम्ही तेलंगणा व कर्नाटकमध्ये हे केले आहे. त्यामुळे आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवता आली. बिहारमध्येही सरकार आल्यावर ताबडतोब आम्ही ही मर्यादा हटवणार असल्याची ग्वाही काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी दिली. ते आज बिहारच्या नालंदामध्ये अतीमागासवर्गीयांच्या एका कार्यशाळेत बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेचे स्वरुप समजावून सांगितले. ते म्हणाले की, भाजपा २०२७ मध्ये जाती निहाय जनगणना करणार असल्याचे म्हणत आहे. मला वाटत नाही ते हे करतील. पण मी हे करून दाखवणारच. आमच्याकडे तेलंगणाची व कर्नाटकाची सत्ता आली, तेव्हा आम्ही ते करुन दाखवले. देशातील मागासवर्गीयांची संख्या ९० टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, सत्तेमधील त्यांचा वाटा ५ टक्केही नाही. भाजपाने जातीय जनगणना केली तरी त्याच्या सर्वेक्षणासाठीचे प्रश्न काही अधिकारी बंद खोलीत बसून काढतील. आम्ही तेलंगणा व कर्नाटकात मासागासवर्गीयांच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्यांकडून प्रश्न घेतले.जातीनिहाय आरक्षण हे संविधान वाचवण्याचे एक माध्यम आहे.

ते पुढे म्हणाले की, बिहार ही सत्य,न्याय व अहिंसेचा संदेश देणारी भूमी आहे. सध्याच्या सरकारने मात्र बिहारची ओळख देशाच्या गुन्ह्याची राजधानी केली आहे. आधी नालंदा मध्ये जगभरातून लोक येत असत. आता बिहारची मंडळी बेरोजगारीमुळे देशाच्या विविध भागांत जात आहेत. ट्रम्प यांनी आतापर्यंत ११ वेळा म्हटले आहे की, युद्धबंदी मी केली मात्र मोदींनी एकदाही त्यांच्या विरोधात एकही चकार शब्द काढलेला नाही. ते शरण गेले आहेत. या देशात मागासवर्गींयांना काही मिळत नाही त्या उलट अदानी अंबानींना तुमची लाखो कोटी रुपयांची जमीन सहज दिली जाते. धारावीसारखी देशाची औद्योगिक सृजनतेचे प्रतीक असलेली वसाहत यांनी अदानींना दिली. लोकांना अशा प्रकारे बाहेर काढले आहे की जसे त्यांना काहीच किंमत नाहीत.