बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल

RCB celebration Stampede

RCB celebration Stampede | आरसीबीआच्या विजयानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात क्रिकेटपटू विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांनी बंगळूरुच्या कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली. हे पोलिस स्टेशन स्टेडियमजवळच असून, या तक्रारीचा समावेश आधीच नोंदवलेल्या प्रकरणात करून त्याची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. ही घटना कशी घडली यासंदर्भात कर्नाटक सरकारने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्टेडियमबाहेरील नाल्यावर ठेवलेला तात्पुरता स्लॅब गर्दीच्या ओझ्यामुळे कोसळला. त्यामुळे अचानक भीती पसरली आणि लोकांनी एकमेकांना तुडवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यात 13 ते 35 वयोगटातील 11 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक जखमी झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) आणि डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी केले होते. रिपोर्टनुसार, पोलिसांनी प्रशासनाला कार्यक्रम रविवारी ठेवण्याचा सल्ला दिला होता, मात्र सरकारने तत्काळ कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, आरसीबीने विजय मिरवणुकीच्या ट्वीटपूर्वी पोलिसांशी कोणतीही चर्चा केली नव्हती, असेही सांगण्यात येते.

या प्रकरणानंतर पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या जागी सीमंत कुमार सिंग यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी RCB संघ, KSCA, आणि डीएनए एंटरटेनमेंट यांच्याविरोधात अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थांमुळे चेंगराचेंगरी घडल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाले यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी आपल्या अटकेला “बेकायदेशीर” म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्यासह आयोजक कंपनीतील आणखी 3 कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सध्या चेंगराचेंगरीबाबत तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून, यामध्ये आरसीबी व्यवस्थापन, आयोजक आणि क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.