‘लपवण्यासारखे काही नसेल तर…’, निवडणूक आयोगाच्या प्रत्युत्तरानंतर राहुल गांधींनी केली ‘ही’ मागणी.

Rahul Gandhi on Maharashtra Elections

Rahul Gandhi on Maharashtra Elections | काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केल्याने राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाकडून “पूर्णपणे अतार्किक” असे म्हणत फेटाळण्यात आले आहे. तसेच, भाजपकडूनही यावरून राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना “पूर्णपणे अतार्किक” असे म्हणत फेटाळल्यानंतर, गांधींनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रत्युत्तर दिलं.

राहुल गांधींनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले, “निवडणूक आयोग, तुम्ही एक घटनात्मक संस्था आहात. अस्वाक्षरीत व अस्पष्ट नोट्स पाठवून गंभीर प्रश्न टाळणे योग्य नाही. जर लपवण्यासारखं काही नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची स्पष्ट उत्तरं द्या.” त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केलं की त्यांनी महाराष्ट्रासह सर्व निवडणुकांची मतदार यादीआणि मतदान केंद्रांवरील सायंकाळी 5 नंतरचे CCTV फुटेज सार्वजनिक करावं.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुढे नमूद केले, “जर तुम्हाला काहीही लपवायचे नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरे द्या आणि ते सिद्ध करून दाखवा: लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या सर्वात अलीकडील निवडणुकांसाठी एकत्रित, डिजिटल, मशीन-रीडेबल मतदार याद्या प्रकाशित करा, ज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. तसेच, महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील सायंकाळी 5 नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जारी करा.”

“पळवाटा काढल्याने तुमची विश्वासार्हता वाचणार नाही. सत्य सांगितल्यानेच ती वाचेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राहुल गांधींनी हे प्रत्युत्तर निवडणूक आयोगाने (ECI) त्यांच्या ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना “पूर्णपणे अतार्किक” म्हणत जारी केलेल्या निवेदनानंतर काही तासांनी दिले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले होते की, “मतदार याद्या तयार करण्यापासून ते मतदान आणि मतमोजणीपर्यंत, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत पार पडते आणि राजकीय पक्ष/उमेदवारांनी अधिकृतपणे नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे सर्व घडते.”

निवडणूक आयोगाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, “कोणीही, कोणताही चुकीचा प्रचारकरत असेल, तर तो केवळ कायद्याचा अनादरच नाही, तर आपल्याच राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारा आणि निवडणुकीत अथक व पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे.”

“मतदारांकडून कोणताही प्रतिकूल निकाल आल्यानंतर, निवडणूक आयोगाशी तडजोड झाली आहे असे सांगून बदनामी करण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे अतार्किक आहे,” असे निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटले होते. राहुल गांधींनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करणारा आपला लेख शेअर केल्यानंतर निवडणूक आयोगाने हे प्रत्युत्तर दिले होते.

राहुल गांधींचे आरोप काय?

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे. हा निवडणूक चोरीचा प्रकार आहे. 2024 ची महाराष्ट्रातील निवडणूक लोकशाहीच्या गैरप्रकाराची ब्लूप्रिंट आहे. टप्प्याटप्प्याने हे षड्यंत्र रचण्यात आले. यातील पहिला मुद्दा, निवडणूक आयोगाच्या पॅनलच्या नियुक्तीत हेराफेरी करण्यात आली. दुसरा मुद्दा म्हणजे मतदार याद्यांत बोगस नावे घुसडण्यात आली. तिसरा मुद्दा असा की, मतदानाचे प्रमाण वाढवून सांगण्यात आले. चौथा मुद्दा, भाजपाला ज्या ठिकाणी विजय मिळवायचा होता त्या ठिकाणी ठरवून बोगस मतदानाचा प्रयोग केला. पाचवा मुद्दा सांगायचा तर, हे सर्व केल्यानंतर सर्व पुरावे लपवले. महाराष्ट्रात भाजपा इतका हताश का होता हे समजणे कठीण नाही. पण मॅच फिक्सिंगने त्यांनी निवडणूक जिंकली. महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली तीच बिहारमध्ये होईल. कारण भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो. जिथेजिथे भाजपा हरत असेल तिथे तिथे मॅच फिक्सिंग होईल.

देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील आरोपानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात., असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच, लेखाचे उत्तर लेखानेच देऊ असेही ते म्हणाले.