मुंबई लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू! 9 जखमी! दारात उभ्या प्रवाशांच्या बॅगा धडकल्याने पडले!


ठाणे- मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन जलद लोकल गाड्यांमधील 13 प्रवासी बॅगा आदळल्याने खाली पडले. या अपघातात 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 9 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दोन लोकल गाड्या होत्या असे सांगितले असले तरी प्रत्यक्षदर्शींनी दोनपैकी एक गाडी ही पुष्पक एक्स्प्रेस होती असे म्हटले आहे . पुष्पक एक्स्प्रेसचा धक्का लागून कसारा लोकलमधील प्रवासी खाली पडले असे सांगितले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुष्पक एक्स्प्रेसचा उल्लेख का टाळला असा प्रश्न निर्माण झाला.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सीएसएमटीकडून येणारी आणि सीएसएमटीकडे जाणारी अशा या दोन लोकल मुंब्रा स्थानकाजवळ एका वळणावर अत्यंत जवळ येतात. आजचा अपघात या वळणावरच झाला. हे वळण धोकादायक आहे असे पत्र एका प्रवाशाने यापूर्वीच रेल्वे प्रशासनास लिहिले होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आजच्या अपघातात पत्र लिहिणारा प्रवासी गंभीर जखमी झाला. त्याचे दोन्ही पाय कापले गेले आहेत.
आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे मार्ग क्रमांक तीन या जलद मार्गावरून एक गाडी टिटवाळाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने तर त्याचवेळी मार्ग क्रमांक चारवरून दुसरी गाडी सीएसएमटीकडून टिटवाळ्याच्या दिशेने येत होती. जलद गाड्यांना मुंब्रा रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने दोन्ही गाड्या वेगाने धावत होत्या. मुंब्रा आणि दिवा स्थानकाच्या दरम्यान रेल्वेमार्गावर असलेल्या धोकादायक वळणावर दोन्ही गाड्यांमधील अंतर कमी झाल्याने डब्याच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि त्याच्या दणक्याने 13 प्रवासी लोकलमधून धडाधड रेल्वे रुळावर पडले. यात महिलाही होत्या. त्यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. 9 जखमींना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात, ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवा गवळी हा गंभीर असून, ठाण्यात ज्युपिटर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघात घडला त्या गाडीतील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार प्रवासी खाली पडल्याचे कळताच डब्यातील प्रवाशांनी साखळी खेचून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी कळवा रेल्वे स्थानकावर न थांबता थेट ठाणे स्थानकावर जाऊन थांबली. रुळावर पडलेल्या प्रवाशांना मुंब्रा स्थानकातील प्रवाशांनी व रेल्वे पोलिसांनी रुळावरून बाजूला नेले. त्यानंतर त्यांना ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. रेल्वेची रुग्णवाहिका सुमारे अर्ध्या तासाने घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना मदत मिळण्यास उशीर झाला.
या अपघातात गव्हर्मेंट राखीव पोलीस दलातील (जीआरपी) विकी बाबासाहेब मुखादल यांचा मृत्यू झाला. ते ठाणे जीआरपीच्या सेवेत होते. ते आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांचे आईवडील गावी शेती करतात.
अपघाताची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी रेल्वे प्रशासनाकडून पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची जंत्रीच सांगितली. ते म्हणाले की, यापुढे सर्व नव्या रेल्वे गाड्यांना स्वयंचलित बंद होणारे दरवाजे असतील. सध्या वापरात असलेल्या गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद होणारे दरवाजे बसवता येतील का याचा अभ्यास केला जाईल. कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत तिसरी व चौथी लाईन टाकण्याची योजना आहे. कल्याण ते सीएसएमटी मार्गावर पाचवी व सहावी लाईन टाकण्यासाठी जमीन ताब्यात घेण्याचे काम कुर्ला पर्यंत पूर्ण झाले असून, पुढील काम सुरू आहे. 10 हजार कोटी रुपयांच्या योजना नियोजित आहेत. डबे वाढविणे आणि जलद लोकल वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आस्थापनांनी वेगवेगळ्या कामाच्या वेळा ठेवाव्या असे आवाहन केले होते. मात्र त्याला काहीच आस्थापनांनी प्रतिसाद दिला. उपनगरी रेल्वेच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच अपघात आहे, असेही स्वप्निल नीला यांनी सांगितले. स्वप्निल नीला यांच्या या खुलाशावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रवासी म्हणाले की, अपघात झाला की, अशी उत्तरे देतात. नंतर प्रगती काहीही होत नाही. ते म्हणतात की, आम्ही लटकत असतो, पण ही आमची इच्छा नसते. आम्ही उशिरा पोहोचलो तर लेटमार्क लागतो. आम्हाला दोष देण्यापेक्षा त्यांना जादा लोकल सोडायला काय होते?
या अपघाताला पूर्णपणे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली. दिवा रेल्वे स्थानकावरून विशेष लोकल गाड्या सोडल्या आणि कसाऱ्यावरून येणाऱ्या जलद गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा दिला तर सकाळच्या वेळी गाड्यांमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीची समस्या मिटेल, असे काही प्रवाशांनी सांगितले. गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वातानुकूलित गाड्या आहे. या वातानुकूलित गाड्यांमुळे दोन सामान्य गाड्यांमधील वेळ वाढतो. त्यामुळे वातानुकूलित गाडीच्या मागून येणाऱ्या गाडीत प्रवाशांची संख्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा जीव वाचवायचा असेल तर गर्दीच्या वेळी वातानुकूलित गाड्या बंद करा, अशी मागणी काही रेल्वे प्रवाशांनी केली. रेल्वे प्रशासन नेहमी मोठमोठ्या रेल्वे प्रकल्पांच्या घोषणा करते. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे काम प्रशासनाला करता आलेले नाही. नुसत्या घोषणा करून आणि वंदे भारत गाडी चालवून सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना काही फायदा होणार नाही. मध्य रेल्वेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या तरच सर्वसामान्यांचा जीव वाचेल, अशी संतप्त प्रतिक्रिया काही रेल्वे प्रवाशांनी
माध्यमांना दिली.
मुख्यमंत्र्यांनी सोलापूर दौरा रद्द केला
अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित सोलापूर दौरा रद्द केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलापूर दौऱ्यात फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-गोवा विमान सेवेचे उद्घाटन करणार होते. घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.
घटना क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूने उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावले उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून, दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले.
मी खूप व्यथित झालो – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले आहेत. मी स्वतः देखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वे मार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असून, नेमका अपघात कशामुळे झाला हे या चौकशीतून लवकरच समोर येईल.
परप्रांतियांच्या लोंढ्यामुळे
बोजवारा – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, परराज्यांमधून येणाऱ्या लोंढ्यामुळे राज्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. कोण कुठून येतो, कुठे जातो काहीही कळत नाही. या लोंढ्यांमुळेच हा अपघात घडला आहे. हे लोंढे थांबवले पाहिजे. आपल्या देशात मुळात माणसाची किंमत नाही. अपघात होत नाही असा एकही दिवस जात नाही.
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईत दररोज सरासरी 7 जण रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडतात. याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. एवढ्या लोकांचा बळी घेऊनही वैष्णव निर्लज्जपणे खुर्चीला चिकटून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे वर्षा गायकवाड म्हणाले. मात्र आज रेल्वे मंत्र्यांनी कोणतीच प्रतिक्रिया जाहीर केली नाही.
स्वयंचलित दरवाजे हास्यास्पद
सर्व गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिलेल्या माहितीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खिल्ली उडवली. रेल्वे गाड्यांमधील गर्दी पाहता स्वयंचलित दरवाजे ही कल्पनाच हास्यास्पद आहे. दरवाजे बंद झाले तर प्रवाशांना श्वास घेणे अशक्य होईल. ही समस्या खरोखरच सोडवायची असेल तर दिवा स्थानकापासून सुटणारी गाडी सुरू करावी लागेल. त्याचा कल्याण-डोंबिवलीकरांनाही लाभ होईल. वातानुकूलित रेल्वे गाड्या सुरू केल्यापासून सामान्य गाड्यांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. गोरगरिबांना वातानुकूलित प्रवास परवडत नाही. त्यांच्यासाठी सामान्य गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या तर फायद्याचे ठरेल, असे आव्हाड म्हणाले.

मृतांची नावे
अपघातात मरण पावलेल्या चार प्रवाशांची ओळख पटली आहे. राहुल संतोष गुप्ता (दिवा, 28), सरोज केतन (उल्हासनगर, 23), मयूर शहा (50) आणि विक्की बाबासाहेब मुख्यादल (पोलीस हवालदार 33 )या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
जखमींची नावे
शिवम गवळी (23), आदेश भोईर (कसारा, 26), अनिल मोरे (40), तुषार भगत (टिटवाळा 22), मनीष सरोज (दिवा 26), मच्छिंद्र गोतारणे (वाशिंद, 39), स्नेहा धोंडे टिटवाळा, रिहान शेख (भिवंडी) आणि प्रियंका भाटिया (शहाड) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.
जखमी भावाची स्थिती पाहून
तरुणाला अश्रू अनावर

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या अपघातात कल्याण फाटा येथे राहणारा शिवम गवळी गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघाताची बातमी मिळताच शिवमचा भाऊ आणि इतर नातेवाईक तातडीने रुग्णालयात दाखल झाले. शिवमला जखमी अवस्थेत बघून त्याच्या भावाला अश्रू अनावर झाले. रुग्णालयाच्या बाहेर एका कठड्यावर बसून तो रडत होता. त्याला सावरण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला.
शिवम गवळी मागील वर्षभरापासून मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. दररोज तो दिवा येथून प्रवास सुरू करतो. नेहमीप्रमाणे त्याने दिवा स्थानकातून प्रवास सुरू केला होता. मात्र या दरम्यान घडलेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी 5 लाखांची मदत

दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कळवा रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमींची भेट घेतली. अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमी झालेल्या जखमीची तीव्रता पाहून 50 हजार ते दोन लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा महाजन यांनी केली.