रागाने केलेल्या हल्ल्यातील मृत्यू हा खून नव्हे, सदोष मनुष्यवध !

पणजी – आरोपीने रागाच्या भरात मृतावर हल्ला केला. खून करण्याचा आरोपीचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपी खून नाही तर, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवित म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभूदेसाई यांनी आरोपी असलेल्या एका कामगाराला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये आरोपी एव्हढी वर्षे आधीच तुरुंगात राहिला असल्याने त्याची न्यायालयाने सुटका केली.
१४ एप्रिल २०१९ रोजी रात्री ८ वाजता पर्वरीतील पुंडलिकनगर येथे पीडब्ल्यूडी पाण्याच्या टाकीच्या आवारात आरोपी रमन्ना बद्दी याने त्याचा साथीदार बसप्पा यमनप्पा हंशीकुट्टी याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून तो पसार झाला होता. आरोपी बद्दी आणि बसप्पा या दोघांनीही दारू प्राशन केली होती. त्यादिवशी दुपारपासून एकमेकांशी भांडण करीत होते, याचदरम्यान रात्री आठ वाजता बद्दीने बसप्पा यमनप्पा हंशीकुट्टी याच्यावर कुऱ्हाडीने वार करून पळ काढला. त्यानंतर रुग्णालयात उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रमन्ना बद्दी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सुनावणीवेळी न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी बद्दी याला खून प्रकरण ऐवजी सदोष मनुष्यवध प्रकरणी दोषी ठरविले. संशयिताचे वय आणि तब्येतीची माहिती देऊन अ‍ॅड.प्रवीण नाईक यांनी संशयिताची शिक्षा कमी करण्याची मागणी केली. त्यानुसार संशयिताची त्याने भोगलेली सहा वर्षे एक महिना आणि २१ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावून त्याची सुटका केली.