नवी दिल्ली- देशात कोरोना बाधितांची सध्या झपाट्याने वाढत आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६५०० वर पोहोचली असून दररोज सुमारे ४०० नवीन रुग्णांची नोंद होत आहे. यात केरळ राज्यात सर्वाधिक १९५७ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे आतापर्यंत ११ राज्यांमधील ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ५८ मृत्यू गेल्या १० दिवसांत झाले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये काल ३ डॉक्टरांसह ६ नवीन रुग्ण आढळले. यानंतर, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग हाय अलर्ट मोडवर आले. मध्य प्रदेशमध्ये सध्या ४३ सक्रिय रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल राज्यातील सर्व प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. “आशा आहे की, हा आजार पुन्हा येणार नाही, परंतु आपल्याला तयार राहावे लागेल. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांची पूर्ण व्यवस्था आहे, त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही,” असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटले.