अहमदाबाद – अहमदाबादमधील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेपूर्वी निघणाऱ्या आणि धार्मिक महत्व असलेल्या साबरमती जलयात्रेच्या (sabarmati Jail Yatra)मार्गात नदीवर आक्रमण केलेल्या जलपर्णीमुळे अडथळा आला आहे . या नदीत मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या जलपर्णींमुळे नदीचे पवित्र पाणी घेऊन जाणारी नाव किनाऱ्यावर पोहोचू शकली नाही.अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने नावेतील लोकांना किनाऱ्यावर आणण्यात आले.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि कोट्यवधी हिंदुंची श्रद्धा असलेल्या जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात देव जगन्नाथ (श्रीकृष्ण), बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या पूजेपासून होते. या पूजेसाठी जल यात्रेच्या माध्यमातून साबरमती नदीचे पाणी १०८ कलशांमधून आणले जाते.समाजातील मान्यवर व्यक्ती या जलयात्रेमध्ये सहभागी होतात.
या वर्षीची जगन्नाथ रथयात्रा १४८ वी रथयात्रा आहे.या धार्मिक सोहळ्यापूर्वी साबरमती नदी जलपर्णीमुक्त करणे आवश्यक होते.अहमदाबाद महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी नदीतील ५५ टन जलपर्णी काढल्याचा, तसेच नदी सफाईचे शिल्लक काम जलयात्रेपूर्वी पूर्ण होईल,असा दावा केला होता.हा दावा फसवा ठरला.
