डेहराडून – अलीकडच्या काळात चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. चढाईचा त्रास टाळण्यासाठी अनेक भाविक हेलिकॉप्टर सेवा वापरतात. मात्र, हीच सेवा आता धोकादायक ठरू लागली आहे. आज केदारनाथ धामकडे जात असलेल्या आर्यन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरचा ( Aryan Aviation Pvt Ltd )भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वैमानिकासह सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर चारधाम यात्रेतील सर्व हेलिकॉप्टर सेवांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते. आज पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण दरम्यानच्या जंगलात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात प्रवासी होते आणि सर्वांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वैमानिक राजबीर सिंग चौहान यांच्यासह विक्रम रावत, विनोद देवी, त्रिशती सिंग, महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि काशी जयस्वाल (२) यांचा समावेश आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर एनडीआरएफ व एसडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ कारवाई सुरू केली आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami )यांनी दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन राज्यातील हेलीसेवा संचालनासाठी कठोर एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आदेश दिले की, उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी बंधनकारक करावी तसेच हवामानाची अचूक माहिती घेणे अनिवार्य करावे. त्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असून, ती सर्व तांत्रिक व सुरक्षिततेच्या पैलूंचा आढावा घेऊन नव्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार करणार आहे.
यापूर्वी ८ मे रोजी गंगोत्रीच्या दिशेने जाणारे एक हेलिकॉप्टर दरीत कोसळले होते. या दुर्घटनेत पाच प्रवासी आणि पायलटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, ७ जून रोजी केदारनाथकडे पाच भाविकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे उत्तराखंडमधील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. उड्डाणानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने बडासूजवळील रस्त्यावर ते उतरवले. लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टरच्या मागचा भाग रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला धडकला. सुदैवाने गाडीमध्ये कोणीही नसल्यामुळे कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाली नव्हती.