मावळ- पुणे तालुक्यातील मावळच्या दाभाडे गावात असलेल्या कुंडमळा येथील अत्यंत जुना जर्जर झालेला इंद्रायणी नदीवरील पूल आज दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक कोसळला. यावेळी पुलावर किमान 50 पर्यटक होते. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाने त्वरित बचावकार्य सुरू केले. यात 37 जणांना वाचविण्यात यश आले. त्यांच्यावर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईत लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेच्या धक्क्यातून सावरलेले नसतानाच अहमदाबाद येथे विमानाला प्रचंड मोठा अपघात होऊन 275 जणांचा धक्कादायक मृत्यू झाला. त्यानंतर आज आणखी भीषण दुर्घटना घडली.
कुंडमळाजवळ इंद्रायणी नदीवर जुना जर्जर झालेला लोखंडी पूल आहे. हा अरुंद पूल मंदिराकडे जाण्यासाठी वापरला जातो. पावसाळ्यात या पुलावर पर्यटकांची गर्दी होते. नदीचे उफाळणारे स्वरुप पाहण्यास अनेक जण लोटतात. आज रविवार असल्याने येथे पुन्हा एकदा गर्दी झाली होती. हा पूल धोकादायक असल्याचा कोणताही सूचनाफलक पुलाच्या दोन्ही बाजूला लावलेला नाही. पर्यटक या पुलावर मोठ्या प्रमाणात येत होते. तरीही प्रशासनाने त्यांना अडविण्यासाठी कोणतीही तजवीज केलेली नव्हती. दुपारपर्यंत या पुलावर जवळजवळ 50 पर्यटक जमा झाले होते. त्यात 4 दुचाकीही होत्या. हे वजन न पेलवल्याने अचानक हा पूल मधोमध तुटला. त्याबरोबर पुलावर असलेल्यांपैकी अनेक जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. हा पूर्ण खडकाळ भाग आहे. इंद्रायणी नदी येथे अत्यंत वेगाने वाहते. या नदीत 4 कुंडही आहेत. गेले काही दिवस मावळात जोरदार पाऊस होत असल्याने ही नदी दुथडी भरून वाहत होती. हे दृश्य पाहण्यास पर्यटक आले होते. ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक रहिवासी, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांनी वेगाने शोधकार्य सुरू केले. घटनास्थळी 18 रुग्णवाहिका आणण्यात आल्या. स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वी त्यांनी या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत 4 जणांचे मृतदेह हाती लागले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, 37 जणांना वाचविण्यात यश आले असून त्यांच्यावर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी रात्री लाईट लावून एनडीआरएफच्या जवानांचे बचावकार्य मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सुरू होते. कोसळलेल्या पुलाखालून जवानांनी एका लहान मुलाचा मृतदेह बाहेर काढला. जवानांनी क्रेनद्वारे रात्री 9.30 वाजता पुलाचे दोन भाग बाहेर काढले. त्यावेळी पुलाखाली कोणी आहे का, याची जवानांनी पूर्ण चाचपणी केली. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य तात्पुरते थांबवले. उद्याही बचावकार्य सुरू राहणार आहे. रोहित माने आणि चंद्रकांत साटले, अशी मृतांची नावे आहेत. दोन मृतांची नावे उघड झालेली नाही. दोन जण बेपत्ता आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची दखल घेत अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. स्थानिक माजी आमदार बाळा भेगडे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी मदतकार्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सायंकाळी अंधार पडेपर्यंत मदतकार्य सुरू होते. उबाठा नेत्या सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या की, हा पूल अत्यंत जर्जर झाला होता. ग्रामस्थांनी वारंवार नव्या पुलाची मागणी केली होती. मात्र लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे दुर्लक्षच केले. पुलाच्या दोन्ही बाजूला सूचनाफलकही लावले नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा पूल जुना होता. त्यामुळे नवीन पुलाची वर्कऑर्डर 10 जूनला िदली होती.
