कोकणात पावसाचा जोर वाढला! नद्या उफाळल्या! गावांना वेढा

मुंबई- राज्यात पावसाचा कालपासून जोर वाढला आहे. कोकणाला पावसाने झोडपून काढले आहे. कोकणातील सर्वच नद्या दुथड्या वाहून काही गावांना वेढा बसला, बंधारे वाहून गेले, बाजारपेठेत पाणी शिरले. पुढील 48 तासही मुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबईतही संततधार सुरू होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ जानवली नदीची जलपातळी वाढल्यामुळे गणपती साना या गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. याशिवाय जिल्ह्यातील नेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, राजापूर, लांजा, संगमेश्वर भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वशिष्ठी, जगबुडी, कोदवली, शास्त्री, सोनवी, असावी या प्रमुख नद्यांनी जलपातळी ओलांडल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. अर्जुना नदीत वाढलेल्या पाण्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी साचले होते. पावसामुळे संगमेश्वर – कांबळेवाडी रस्ता बंद झाल्याने दळणवळणाची अडचण झाली आहे. प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज परशुराम घाटात बांधलेल्या सुरक्षा भिंतीची माती खचली. इथे दरड कोसळण्याचे प्रकार घडतात यासाठी सुरक्षेकरिता गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र तरीही माती रस्त्यावर येत असल्याने घाटातील वाहतूक धोकादायक ठरत आहे. रायगडमध्येही कुंडलिका, अंबा, काळ, सावित्री या नद्या भरल्या आहेत. मुंबई – गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली. जास्त पाऊस झाल्यास आणखी काही भाग रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे – कोलाड मार्गावर पिरंगुटजवळ पुलाचा भराव वाहून गेला आणि पाणी साचले. त्यामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली.
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील भुशी डॅम 100 टक्के भरल्याने ओसंडून वाहू लागला आहे. याशिवाय मुळशी तालुक्यातील नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील पिंपळगाव गरुडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. कोल्हापूरलाही आज जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग-कोल्हापूर रस्त्यावर करुळ घाटात दरड कोसळली. राजाराम बंधारा पाण्याखाली गेला.
मुंबईतही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे लोकलच्या तीनही मार्गांवरील ट्रेन उशिराने धावत होत्या. उल्हासनगरच्या गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याने 500 पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला. हा पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. नवी मुंबईतही सतत पाऊस कोसळत असल्याने बाजारा समितीत असलेला कृषीमाल घेण्यासाठी ग्राहक आले नाहीत. परिणामी 550 गाड्यांतून आलेला माल तसाच पडून राहिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 109 मिमी पाऊस
मागील 24 तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 142 मिमी पाऊस दोडामार्ग तालुक्यात झाला आहे. सावंतवाडीमध्ये 132 मिमी, वेंगुर्ले 129 मिमी, वैभववाडी 122 मिमी, कुडाळ 113 मिमी, मालवण 105 मिमी, देवगड 98 मिमी आणि कणकवली 95 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
वाशी प्लाझाची भिंत कोसळली
नवी मुंबईच्या सेक्टर 17 मध्ये पावसामुळे वाशी प्लाझाची भिंत कोसळली. कोसळलेल्या भिंतीचा भाग वाहनांवर पडला. त्यामुळे येथे उभ्या असलेल्या 10-15 वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी बचाव पथक दाखल झाले. पथकाने ढिगारा हटवला.