Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सने (FATF) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळाशिवाय असे हल्ले शक्य होऊ शकत नाहीत, असे FATF ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
या हल्ल्यामुळे भारताने सातत्याने मांडलेला दावा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे की, सीमापार दहशतवाद आणि त्याला मिळणारा आर्थिक पुरवठा यामागे पाकिस्तान-प्रणित दहशतवादी गटांचा हात आहे.
पॅरिसस्थित या जागतिक संस्थेने दहशतवादी निधीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. FATF ही संस्था दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे काम करते. FATF च्या मते, हवाला, बोगस स्वयंसेवी संस्था (NGOs), आणि क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल साधनांचा वापर करून दहशतवादी गट सीमापार आर्थिक व्यवहार करतात. पहलगाम हल्ल्यासारख्या घटना या आर्थिक नेटवर्कशिवाय अशक्य आहेत, असे FATF चे निवेदन सूचित करते. यामुळे भारताला पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी मिळाली आहे.
2022 मध्ये पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमधून वगळण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही इस्लामाबादने आपल्या देशातील दहशतवादी नेटवर्कवर ठोस कारवाई केली नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. FATF च्या या निषेधामुळे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताने यापूर्वीही हवाला, क्राउडफंडिंग, आणि व्हर्च्युअल मालमत्तांचा गैरवापर यासारख्या नवीन धोक्यांबाबत FATF ला पुरावे सादर केले आहेत.
FATF ने समाजमाध्यमांचा गैरवापर आणि क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापरावरही चिंता व्यक्त केली आहे. पारंपरिक पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांना बगल देण्यासाठी दहशतवादी गट या साधनांचा वापर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी वित्तपुरवठ्याविरोधातील कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे FATF ने ठासून सांगितले आहे.
लवकरच FATF दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या पद्धतींवर एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध करणार आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील केस स्टडीजचा समावेश असेल. तसेच, नवीन धोक्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक वेबिनारचे आयोजनही केले जाणार आहे. FATF च्या अध्यक्षा एलिसा डी अॅंडा माड्राझो यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जागतिक एकजुटीवर भर दिला आहे. “दहशतवाद्यांना एक यश पुरेसे असते, पण देशांना प्रत्येक हल्ला रोखावा लागतो,” असे त्यांनी नमूद केले.
पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना FATF च्या या निवेदनामुळे भारताला आपली भूमिका अधिक ठामपणे मांडण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तानने दहशतवादी नेटवर्कविरुद्ध ठोस पावले उचलावीत, यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची ही एक संधी आहे.