जालना -अधिवेशनात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation)विषय मार्गी लावा. २९ ऑगस्टपर्यंत मी काहीही बोलणार नाही. जर मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil)यांनी महायुती सरकारला दिला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Social Justice Minister Sanjay Shirsat)यांनी सरकारकडून काम सुरू असूनही चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा नोंदी होत आहेत, पण जात पडताळणीसाठी (validity of caste certificates) उशीर केला जात आहे. नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही. विद्यार्थ्यांचे (students)शैक्षणिक नुकसान होत आहे. यातूनच असे वाटते की, काही अधिकाऱ्यांना पैसे कमवायचे आहेत. गरिबांच्या मुलांचे नुकसान करायचे आहे का? १४ जूनपासून आम्ही राज्यातील २८८ आमदारांना फोन करत आहोत. आंतरवाली सराटी (Antarwali Sarati)येथे प्रत्येक आमदाराला बोलावणार आहोत आणि मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहोत. यावरून मराठा समाजाला कळेल की, कोण आपले आणि कोण परके आहेत. गेली दोन वर्षे आम्ही आरक्षणासाठी लढत आहोत. आता २९ ऑगस्टपर्यंत मी काहीही बोलणार नाही. केवळ लोकप्रतिनिधींमार्फत सरकारला संदेश पाठवणार आहे.आजपासून ३ महिने सरकारविरोधात काहीही बोलणार नाही. ३० जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. अन्यथा आम्ही तिघांच्या डोक्यावर गुलाल टाकू. गेल्या वेळेस आम्हाला वाशीतून परत पाठवले होते. तुम्हाला वेळ दिला होता. पण आता जर मी मुंबईला आलो तर मुंबई सोडणार नाही.