नवी दिल्ली – दिल्लीहून इंडोनेशियाच्या बालीसाठी (Bali, Indonesia) रवाना झालेले एअर इंडियाचे एआय २१४५ विमान (Air India flight AI2145) बालीजवळील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुरक्षेच्या कारणास्तव परत दिल्लीला आणण्यात आले. या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल झाले असले तरी विमान सुरक्षितपणे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) उतरलं असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. एअर इंडियाने याबाबत सांगितले की, बाली विमानतळाजवळील ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विमान परत बोलावण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रद्द झालेल्या प्रवासासाठी पूर्ण परतावा किंवा विनामूल्य पुन्हा आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाची (Air India Boeing 787 Dreamliner) तांत्रिक तपासणी सुरू आहे. त्यामुळे कंपनीला अनेक आंतरराष्ट्रीय विमाने रद्द कराव्या लागत आहेत. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (डीसीजीए) माहितीनुसार, १२ ते १७ जूनदरम्यान एकूण ८३ वाइडबॉडी फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, त्यातील ६६ विमाने ड्रीमलायनर होती. १२ जून रोजी घडलेल्या घटनेनंतर डीसीजीए ड्रीमलायनरची तपासणी केली. प्राथमिक चौकशीत कोणतीही गंभीर तांत्रिक त्रुटी आढळून आली नाही. विमाने विद्यमान सुरक्षा मानकांनुसार आहेत, असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे. एअर इंडियाकडे सध्या ३३ बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर विमाने आहेत. काल झालेल्या बैठकीतडीसीजीएने एअर इंडियाला विमान सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे, ऑपरेशन्स अधिक काटेकोर ठेवण्याचे आणि वेळापत्रकांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.