संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Sant Tukaram Maharaj palkhi

पिंपरी चिंचवड- जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांचा ३४० वा पालखी (Palkhi) प्रस्थान सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पालखीतील पवित्र पादुकांचे पूजन झाल्यानंतर पालखी सोहळ्याला विधिवत सुरुवात झाली.देहू नगरीत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सोहळ्याला उपस्थित होते.


श्री संत तुकाराम महाराज संस्थानने यंदा सोहळ्यासाठी तीन नवीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. सोहळ्यानंतर पालखीचा आजचा पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे असेल. उद्या पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.


आज पहाटेपासूनच देहू नगरीत वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पहाटे ४.३० वाजता शिळा मंदिरात अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकड आरती व पूजन करण्यात आले. संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचे पूजन या वेळी करण्यात आले. विशेष म्हणजे पूजनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिर परिसरात फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.तत्पुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिरात जाऊन तुकोबांचे दर्शन घेतले. सोहळ्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान, पादुका पूजन सुरू असताना काही काळासाठी दिंड्या थांबवण्यात आल्या. त्यामुळे मानाच्या दिंड्यांतील वारकरी संतप्त झाले. मंदिर परिसरात प्रवेश न मिळाल्याने काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांना एकाच वेळी सोडले असते, तर चेंगराचेंगरी झाली असती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिंड्यांचे नियोजन करण्यात आले.