पद्मश्रीने सन्मानित ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maruti Chitampalli Passes Away

Maruti Chitampalli Passes Away | प्रख्यात लेखक, पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संशोधक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचे काल (18 जून) सायंकाळी सोलापुरात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या चितमपल्ली यांच्या निधनाने मराठी साहित्य, पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यास क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, अंथरुणाला खिळले होते आणि पायाला जखम झाल्याने त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली आणि सायंकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

अरण्यऋषी: निसर्गप्रेमी आणि व्यासंगी संशोधक

सोलापुरात जन्मलेल्या मारुती चितमपल्ली यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्ग, वन्यजीव आणि साहित्याला समर्पित केले. त्यांनी सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले, तर दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कोईमतूर, बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि डेहराडून येथील वन आणि वन्यजीव संस्थांमधून त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले.

संस्कृत भाषेचे सखोल अध्ययन त्यांनी नांदेड, पुणे आणि पनवेल येथील पंडितांकडून केले. जर्मन, रशियनसह 13 भाषांचे ज्ञान असलेल्या चितमपल्ली यांनी देशभरातील आदिवासी आणि जमातींशी संवाद साधून पर्यावरणविषयक मौल्यवान माहिती संकलित केली. महाराष्ट्राच्या वनविभागात 36 वर्षे सेवा देताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. 1990 साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक असताना ते निवृत्त झाले.

चितमपल्ली यांनी 5 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून वन्यजीव आणि निसर्गाविषयीच्या नोंदी शेकडो डायऱ्यांमध्ये जतन केल्या. या नोंदींवर आधारित ‘पक्षीकोश’, ‘प्राणीकोश’, ‘मत्स्यकोश’ यांसारखे शास्त्रीय ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांची 25 हून अधिक पुस्तके वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचे सखोल वर्णन करतात. त्यांच्या ‘रातवा’ या पुस्तकाला 1993-94 साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला, तसेच त्यांना अनेक साहित्यिक सन्मान प्राप्त झाले.

त्यांच्या सर्जनशील आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे त्यांना ‘अरण्यऋषी’ ही उपाधी मिळाली. 2006 साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे लेखन निसर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.