भारताची संरक्षण क्षमता 50-60 टक्के, हवाई दलाची ताकद वाढवण्याची गरज; माजी लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले मत

Indian Air Force

Indian Air Force : पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकस्थित दहशतवादी तळांवर अचूक निशाणा साधला. तसेच, पाकच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. असे असले तरीही भारतीय हवाई दलाची क्षमता अधिक वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी भारताच्या हवाई दलाच्या सामर्थ्यावर आणि प्रतिबंधक धोरणांवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारत पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या क्षमतेत मागे राहू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला. एका लेखात पनाग यांनी म्हटले की, भारताने स्वदेशी ‘अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) ला सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानात श्रेणीसुधारित करण्याबाबत गंभीरपणे विचार करावा.

चीन आणि पाकिस्तानची आघाडी

पनाग यांनी नमूद केले की, चीनकडे J-20 आणि J-35 ही दोन पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत, तर पाकिस्तानला लवकरच 40 J-35 विमाने आणि तुर्कीचे KAAN विमान मिळण्याची शक्यता आहे. याउलट, भारताचा AMCA अजूनही विकासाधीन आहे आणि 2035 पूर्वी तो सेवेत येणे शक्य नाही. J-35 चे PL17 क्षेपणास्त्र 400 किमीच्या पल्ल्याने इतर सर्व क्षेपणास्त्रांपेक्षा सरस आहे, असे त्यांनी सांगितले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मागील महिन्यात AMCA कार्यक्रमाला मंजुरी दिली, ज्यामुळे पाच प्रोटोटाइपवर काम सुरू झाले. पहिले प्रोटोटाइप 2028 च्या अखेरीस किंवा 2029 च्या सुरुवातीस तयार होईल, अशी अपेक्षा आहे. AMCA हे भारताचे पहिले स्वदेशी पाचव्या पिढीचे स्टील्थ लढाऊ विमान आहे.

लष्करी क्षमता आणि ऑपरेशन सिंदूर

पनाग यांनी सावध केले की, चीन आणि पाकिस्तानच्या एकाचवेळी धोक्यांविरुद्ध भारताची लष्करी क्षमता इच्छित पातळीच्या केवळ 50-60 टक्के आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना ते म्हणाले की, राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांमध्ये स्पष्टतेचा अभाव होता. दहशतवाद्यांना शिक्षा देण्याऐवजी पाकिस्तानवर दबाव टाकणे आणि मानसिक पराभव लादणे हे उद्दिष्ट असायला हवे होते.

पनाग यांनी इस्त्रायलप्रमाणे वास्तविक वेळेतील गुप्तचर माहिती आणि ड्रोन युद्धावर भर देण्याची गरज व्यक्त केली. मानवरहित हवाई प्रणाली, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि प्रगत हवाई संरक्षण नेटवर्कमध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ड्रोनचा वापर केवळ 25-30 टक्के होता, असे ते म्हणाले. इलेक्ट्रॉनिक आणि सायबर युद्धासाठीही भारताने तयारी करावी, असे त्यांनी सुचवले.

दरम्यान, रिपोर्टनुसार भारत रशियाच्या SU-57 लढाऊ विमानाच्या सह-उत्पादनाच्या प्रस्तावावर विचार करत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची नाशिकमधील SU-30 उत्पादन लाइन याला समर्थन देऊ शकते. तसेच, सॅफ्रान आणि रोल्स-रॉयसकडून 100% तंत्रज्ञान हस्तांतरणासह स्वदेशी इंजिन विकसित करण्याच्या ऑफरचा विचार सुरू आहे.