छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील मुकुंदवाडी परिसरात नुकतीच एका तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्यानंतर महापालिकेने अतिक्रमणविरोधात मोठी कारवाई केली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली १० ते १२ जेसीबींच्या (JCB) सहाय्याने २२९ अतिक्रमणे (229 encroachments) हटवण्यात आली. मात्र, यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी (businessmen)पालिकेविरोधात आंदोलन केले. कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.
१९ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ, जालना रोडवर तिघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. मटन दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीने कथितपणे मटन कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्याराने नितीन संकपाळ यांच्यावर वार करून त्यांची हत्या (murder)केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरातील अनधिकृत दुकाने उशिरापर्यंत सुरू राहतात आणि त्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेक केली होती. या पार्श्वभूमीवर मनपाने काल तत्काळ कारवाई करत अतिक्रमण हटवली.मात्र, व्यापाऱ्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. ज्या ठिकाणी हत्या झाली, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तरीही आमच्यावर अन्याय करण्यात आला. आम्ही टॅक्स भरतो. मग आमचे दुकान का पाडले ? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
एक महिला व्यावसायिक म्हणाली की , आम्ही ३० वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहोत. कोणतीही नोटीस न देता अचानक दुकाने तोडण्यात आली. मी आणि पतीने एकत्र मसाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. आता कुठे थोडे यश मिळत होते. मात्र अचानक रस्त्यावर आलो आहोत. याला जबाबदार असलेल्या आरोपींना भर चौकात शिक्षा द्यावी. पण आमच्या पोटावर पाय देऊ नये.