हिंदीसाठी बैठका कशाला ?संजय राऊत यांचा सवाल

sanjay raut criticized on Hindi language mandatory


मुंबई –
राज्यात हिंदी भाषा सक्तीची (Hindi language mandatory) करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadanvis) विनाकारण जिवाचा आटापिटा करत आहेत. हिंदी भाषेसाठी बैठका घेण्याची गरजच काय,असा सवाल आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला.


मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राचे हिंदी भाषेशी मुळीच वैर नाही. तसे असते तर इथे हिंदी सिनेसृष्टी एवढी बहरली नसती. मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी भाषिक वृत्तपत्र प्रसिध्द होतात. मुंबईकरांना हिंदी भाषा शाळेमध्ये शिकवण्याची मुळीच गरज नाही. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदी भाषेच्या सक्तीबाबत बैठका कशासाठी घेत आहेत. एक आदेश काढून त्यांना हिंदी सक्तीचा मुद्दा निकाली काढता येईल,असे राऊत म्हणाले.


उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषेत शिकवत असलेल्या ५ हजार शाळा बंद या पडल्या आहेत. अनेक शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. शिक्षकांविना शाळा चालवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आधी हिंदी भाषिक उत्तर प्रदेशातील हिंदीची परिस्थिती सुधारावी,असे राऊत पुढे म्हणाले.