नांदेड – मुंबई-जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा(Vande Bharat Express) नांदेडपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्याला काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे (Congress MP Dr. Kalyan Kale) यांनी विरोध केला आहे. यामुळे मराठवाड्यातील आणखी दोन जिल्ह्यांतील प्रवाशांना या सेवाचा लाभ मिळणार असला, तरी या निर्णयामुळे मूळ प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे.
पूर्वी ही वंदे भारत जालना आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मार्गावरून सीएसएमटी (मुंबई) दरम्यान धावत होती. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी जवळपास १०० टक्के प्रवासी हे याच दोन जिल्ह्यांतील असल्याचे नमूद करत, डॉ. काळे यांनी या बदलावर आक्षेप नोंदवला आहे. स्वतंत्रपणे नांदेडसाठी वेगळी वंदे भारत सुरू करावी, अशी मागणी करत त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनाही निवेदनही दिले आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या आधीपासूनच अनेक गाड्या धावत आहेत. मात्र, जालना–छत्रपती संभाजीनगर मार्गावर वंदे भारत ही एकमेव जलद आणि आधुनिक रेल्वे सेवा होती. ही सेवा पुन्हा पूर्ववत जालना–मुंबई मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.