राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar

Hindi language row | महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा सक्तीने (Hindi language compulsory) लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मनसे आणि ठाकरे गटाने घेतली आहे.

दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात वेगवेगळ्या दिवशी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले आहे. सरकारने हिंदी सक्ती करू नये, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

‘ठाकरे बंधू’ आक्रमक, मोर्चा आणि आंदोलनाची घोषणा

या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जुलै रोजी मुंबईत एका मोठ्या मोर्चाची घोषणा केली आहे. हा मोर्चा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढला जाईल. दुसरीकडे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही 7 जुलै रोजी आझाद मैदानावर स्वतंत्र आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीविरोधात रस्त्यावर उतरल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. मनसेने या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवारांचा सरकारला सल्ला

या मुद्द्यावर बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध केला आहे. ते म्हणाले, “माझ्या मते प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती नसायला हवी. लहान मुलांवर भाषेचा किती ताण द्यायचा, याचा विचार करावा लागेल. पाचवी इयत्तेनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही.”

पवार यांनी सरकारला हा हट्ट सोडावा असा सल्ला दिला आणि मातृभाषा हीच महत्त्वाची असायला हवी यावर जोर दिला. ‘राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का?’ या प्रश्नावर पवार म्हणाले, “मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितले नाही, पण मी ठाकरे बंधूंचे स्टेटमेंट पाहिले आहे. ते काहीही चुकीचे बोलले नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “हिंदी सक्तीचा विषय कोणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत आणि आमचा विचार नकारात्मक नाही.” त्यामुळे शरद पवार 6 जुलैच्या मोर्चात उपस्थित राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.