Puri Rath Yatra Stampede | ओडिशातील (Odisha) पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी (Puri Rath Yatra Stampede) झाल्याची मोठी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 3 भाविकांचा मृत्यू झाला असून, 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दोन महिला आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. ही पहाटे 4:30 वाजता घडली, जेव्हा भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्र यांचे रथ गुंडीचा मंदिराजवळ पोहोचले होते. या घटनेने रथयात्रेच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
काय घडले?
पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिराजवळ दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली होती. अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने काही लोक खाली पडले आणि चेंगराचेंगरी झाली. यात खुर्दा जिल्ह्यातील प्रभाती दास, बसंती साहू आणि 70 वर्षीय प्रेमकांत मोहंती यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनुसार, घटनास्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे.
पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वाईन यांनी सांगितले, “मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मृत्यूचे कारण अहवालानंतर स्पष्ट होईल. सुरक्षा व्यवस्था होती, पण गर्दीमुळे ही दुर्घटना घडली.”
दरम्यान, यंदा रथयात्रा सुरू होण्यास झालेल्या विलंबामुळे राजकीय वाद सुरू झाला आहे. बीजेडीचे (BJD) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी या परिस्थितीला ‘भयंकर गोंधळ’ असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “जेव्हा रथ अडकले होते, तेव्हा फक्त महाप्रभू जगन्नाथ त्यांच्यावर दया करू शकतात. यंदा या दिव्य उत्सवावर ज्या गोंधळाचे सावट पसरले आहे, त्यासाठी जबाबदार असलेल्यांना महाप्रभू जगन्नाथ माफ करो.”
ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी पटनायक यांचे नाव न घेता बीजेडीवर ‘राजकीय विधान’ करत असल्याची टीका केली. “पूर्वीच्या बीजेडी सरकारने चुका करून भगवान जगन्नाथाचा अपमान केला आहे. 1977 पासून रथ नेहमी दुसऱ्या दिवशी गुंडीचा मंदिरात पोहोचले आहेत,” असे त्यांनी म्हटले.
रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती मोठ्या रथांमधून गुंडीचा मंदिराकडे नेल्या जातात. या तिन्ही मूर्ती तिथे एक आठवडा राहिल्यानंतर पुन्हा जगन्नाथ मंदिरात परततात.