दहशतवादी हल्ल्यानंतर ‘माली’मध्ये 3 भारतीयांचे अपहरण, तत्काळ सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न सुरू

Indian Hostages in Mali

Indian Hostages in Mali | पश्चिम आफ्रिकेतील माली देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर तीन भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

मालीच्या कायस येथील डायमंड सिमेंट फॅक्टरीवर सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला करून या भारतीयांना ओलीस ठेवले. भारताने माली सरकारला त्यांच्या सुरक्षित आणि त्वरित सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. बामाको येथील भारतीय दूतावास माली प्रशासनाशी संपर्कात असून, अपहृतांच्या कुटुंबीयांना सहकार्य करत आहे.

1 जुलै रोजी सशस्त्र हल्लेखोरांनी डायमंड सिमेंट फॅक्टरीवर समन्वित हल्ला करून तीन भारतीय नागरिकांना बळजबरीने ओलीस ठेवले. या हल्ल्याची जबाबदारी अल-कायदाशी संबंधित ‘जमात नुसरात अल-इस्लाम वल-मुस्लिमिन’ (JNIM) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे, पण अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने घेतलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने या हिंसक कृत्याचा निषेध करत माली सरकारला तातडीने कारवाई करण्यास सांगितले.

बामाको येथील भारतीय दूतावास माली सरकार, स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि फॅक्टरीच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्कात आहे. दूतावासाने अपहृत भारतीयांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न करत आहोत,” असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले.

भारतीयांना सावधगिरीचा सल्ला

मालीमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाने सतर्क राहण्याचा आणि दूतावासाशी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. “मालीतील भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि नियमित माहिती व मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा,” असे मंत्रालयाने सांगितले.