वारकऱ्यांना नक्षलवादी म्हटल्याचा आरोप करत विरोधकांचा निषेध

मुंबई – राज्य विधमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी वारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या सरकारचा विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन करत निषेध केला. काल शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत काही अर्बन नक्षलवादी घटक वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होत असल्याचा दावा केला. त्यावरून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी निदर्शने करत सरकारच्या भ्रष्टाचाराचा निषेध केला.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहेत. सत्ताधारी वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र धर्माला अर्बन नक्षल म्हणून विठुरायाला आणि वारकऱ्यांना बदनाम करत आहेत. यावेळी घोटाळेबाज सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी, वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो, भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मंत्र्यांचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली.