Marathi Language Row | महाराष्ट्रातील मीरा रोड येथे मराठी न बोलल्याने मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीचा जीआर सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसे, शिवसेने (ठाकरे गट) कडून महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी बोलण्याचा आग्रह केला जात आहे.
व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असताना, आता भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी नव्या वादाला तोंड फोडले. दुबे यांनी राज ठाकरे आणि ठाकरे गटाची तुलना थेट दाऊद इब्राहिमसह केली. सोबतच, टीका करताना ‘कुत्रा’ असा उल्लेख केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
"हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."@RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत निशिकांत दुबे म्हणाले की, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांनामारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.
मुम्बई में शिवसेना उद्धव,मनसे राज ठाकरे और एनसीपी पवार साहब में और कश्मीर से कश्मीरी हिंदुओं को भगाने वाले सलाउद्दीन,मौलाना मसूद अज़हर तथा मुम्बई में हिंदुओं के उपर अत्याचार करने वाले दाउद इब्राहिम में क्या फर्क है? एक ने हिंदू होने के नाते अत्याचार किया दूसरे हिंदी के कारण…
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, मुंबईत शिवसेना (उद्धव), मनसे (राज ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार साहेब) यांच्यात, आणि काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंना हाकलून लावणारे सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर तसेच मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला आणि दुसरे हिंदी असल्यामुळे अत्याचार करत आहेत का?, त्यांच्या या ट्विटमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेत 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशाप्रकारच्या गुंडगिरीविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.