युनेस्कोला गृहीत धरू नका ! राज ठाकरेंचा सरकारला टोला

Don't take UNESCO for granted: Raj Thackeray slams government

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्यांना युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आनंद व्यक्त होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण हा आनंद व्यक्त करतानाच त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही

राज ठाकरे एक्स (X) पोस्ट करत म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत तर एक जिंजीचा किल्ला तामिळनाडूमधील आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता, हे महाराष्ट्राचे कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हेपण कळेल. या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचे किमान नीट संवर्धन होईल, अशी अपेक्षा आहे. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचे संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील. परंतु त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आता निधी उपलब्ध होईल. आत्तापर्यंत जेवढे सरकार आले त्यांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती, त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे आणि आपल्या महाराजांचे, महाराष्ट्राचे वैभव दाखवावे अशी परिस्थिती नव्हती. ती आता बदलेल अशी, आशा व्यक्त करतो. आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहोत की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचे नीट जतन केले आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल.

असो, फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते. ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेते, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणे आहेत. पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचे आणि दुसरे उदाहरण ड्रेस्डन व्हॅलीचे आहे. जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला. मात्र निकष न पाळल्याने तो २००९ ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये, तर एका मोठ्या जबाबदारीचे भानदेखील बाळगावे. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामे आहेत ती तत्काळ पाडून टाका. त्यात जात – धर्म पहाण्याची गरज नाही, असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.