Supreme Court on Madhuri Elephant Case: कोल्हापूरच्या नांदणी मठाची हत्तीण ही आजारी होती म्हणून उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तिला उपचारासाठी गुजरातच्या वंतारा या वन्यप्राणी देखभाल केंद्रात हलविण्यात आली. मात्र या निर्णयाला प्रचंड विरोध होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. आज सर्वोच्च न्यायालयात न्या. पार्डीवाला यांच्या कोर्टात सुनावणी झाली. मात्र निर्णय झाला नाही. न्यायालयाने हा विषय उच्चस्तरीय समितीकडे पाठवला आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा नांदणी मठ आणि राज्य सरकारने निवेदन केले की, माधुरी हत्तीणीला कोल्हापूरला परत पाठवावे. तिथे तिची काळजी घेतली जाईल. याबाबत आम्ही वंताराशीही बोलणार आहोत. जनतेच्या भावना याबाबत तीव्र आहेत. माधुरीला परत पाठवा ही जनतेची आग्रही मागणी आहे. याला पेटा संस्थेने पुन्हा विरोध केला. न्यायालयाने यावेळी म्हटले की, माधुरी आजारी आहे. तिची प्रकृती ठीक नसताना तिला परत का पाठवायचे आहे? आजच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने उच्चस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.
गेली अनेक वर्षे नांदणी मठात असलेली माधुरी हत्तीण ही आजारी असल्याचे काही पशुप्रेमींच्या लक्षात आले. ती जखमी असल्याने तिच्यावर उपचार करावे अशी मागणी करीत पेटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने निर्णय देत माधुरीला वंतारात पाठविण्याचा आदेश दिला. तिथे तिच्यावर उपचार सुरू झाले. पण तिला गुजरातला पाठविल्याने कोल्हापूरची जनता भडकली.
माधुरीला परत आणा, अशी मागणी करीत लोक रस्त्यावर उतरले. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही निघाला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टात दाद मागून तिच्या उपचाराची कोल्हापुरात व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार राज्य सरकारने आज सर्वेाच्च न्यायालयात निवेदन दिले.
हे देखील वाचा – आधी आईवरून शिवी,आता एआय व्हिडिओ; काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या! भाजपाची टीका