नवी दिल्ली -ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे ही मागणी करण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीची आज राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 16 राजकीय पक्ष उपस्थित राहिले. मात्र इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा एकही प्रतिनिधी बैठकीत उपस्थित राहिला नाही. शरद पवार गट हा अजित पवार गटात विलीन होणार असून, ही एकजूट राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देईल अशी चर्चा आहे. त्याला यामुळे बळ मिळाले.
सोळा घटक पक्षांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारला चोहोबाजूनी घेरण्याची रणनिती इंडिया आघाडीने तयार केली आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सतत सवाल करीत हा मुद्दा संसदेबाहेर सातत्याने लावून धरला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेले ऑपरेशन सिंदूरबाबत संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा देशाच्या जनतेला अधिकार आहे, अशी भूमिका घेत राहुल गांधींनी या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची वारंवार मागणी केली आहे. मात्र या मुद्यावर शरद पवार यांनी सुरुवातीपासून नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. देशावर संकट ओढवले असता त्यात पक्षीय राजकारण आणता कामा नये असे शरद पवार यांनी वारंवार म्हटले आहे. त्यातच या कारवाईबाबत माहिती सांगण्यासाठी विविध देशात धाडलेल्या खासदारांच्या कमिटीत सुप्रिया सुळे सहभागी झाल्या आहेत. एकूणच या मुद्यावर सरकारला पाठिंबा द्यायचा असे शरद पवार यांचे धोरण आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार जाणूनबुजून इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहिले नाहीत, अशी चर्चा आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील 16 घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करायची, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगाच्या व्यासपीठावर मांडण्यासाठी केंद्र सरकारने परदेशांत पाठवलेली सर्वपक्षीय शिष्टमंडळे पुढील आठवड्याच्या अखेरीस भारतात परत येत आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात विशेष अधिवेशन बोलवावे, अशी इंडिया आघाडीची मागणी आहे. बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी (सपा), तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय जनता दल (राजद), नॅशनल कॉन्फरन्स, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), विदुथलाई चिरुथैगल कच्ची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, एमडीएमके आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनीनवादी) या पक्षांनी बैठकीला हजेरी लावली.
ऑपरेशन सिंदूर सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर भारत-पाक युद्धविरामाची घोषणा करून टाकली. देशाच्या सुरक्षेच्या अत्यंत संवेदनशील मुद्यावर कोणत्याही त्रयस्थ देशाची मधस्थी नको, अशी भारताची सुरुवातीपासूनची भूमिका असताना पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचा हस्तक्षेप का सहन केला, असा मुद्दा बैठकीत चर्चेस आला. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ टीव्ही वाहिन्यांच्या माध्यमातून रोज करीत असलेले उलटसुलट दावे, ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने आपली किती लढाऊ विमाने पाडली आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत निवेदन करताना पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमाने पाडली, त्यातील तीन राफेल विमाने होती, असा दावा केला होता. त्याचे वास्तव काय हे सरकारने देशाच्या जनतेसमोर आणले पाहिजे, असा आग्रह काही सदस्यांनी धरला.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे लष्करप्रमुख अनिल चौहान यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तानने आपली काही लढाऊ विमाने पाडली अशी कबुली दिल्यानंतर सरकारकडे स्पष्टीकरण मागण्याचा निर्णय बैठकीत झाला. लष्करप्रमुख यांनी दिलेली कबुली खरी की खोटी याचा खुलासा सरकारने अद्याप केलेला नाही. या मुद्यावरूनही सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनितीवर बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानशी शस्त्रसंधीचा करार करताना कोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान या शांती करारामुळे पुन्हा एकत्र आले आहेत का, असे प्रश्न काही पक्षांनी बैठकीत उपस्थित केले. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबरच आम आदमी पार्टीचाही (आप) प्रतिनिधी उपस्थित नव्हता. मात्र उद्या पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी स्वतंत्रपणे करण्यात येईल, असे आपच्या वतीने इंडिया आघाडीला कळवण्यात आले आहे.
