जयपूर- राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मुघल सम्राट अकबर आणि हिंदू राजपूत राजकन्या जोधाबाई यांच्या विवाहाबाबत खळबळजनक वक्तव्य केले. त्यांनी असे म्हटले की, जोधा-अकबर यांच्यातील विवाह खरा झालाच नाही. तो ब्रिटिशांच्या कल्पनेचा खेळ होता. तो त्यांनी नंतर आपल्या इतिहासात घुसडला. या विवाहाचा अकबराचे चरित्र सांगणाऱ्या अकबरनामा या ग्रंथातही उल्लेख नाही. बागडे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये प्रताप गौरव केंद्रातर्फे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केल्याचा आणि भारतीय महापुरुषांना सम्राट अकबराच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल्याचाही आरोप केला. हरिभाऊ बागडे म्हणाले की, राजपुतांची राजकन्या जोधा व मुगल सम्राट अकबर यांच्या विवाहाची कथा ब्रिटिशांच्या प्रभावाखाली असलेल्या इतिहासकारांनी नंतर अकबराच्या चरित्रात आणि इतर लेखनात घुसडली आहे. अकबराच्या कारकिर्दीचा अधिकृत दस्तावेज असलेल्या अकबरनामात या विवाहाचा साधा उल्लेखही नाही. अकबराची पत्नी जोधा ही कुठल्याही राजघराण्यातील नव्हती. आमेरचा राजा भारमल याच्या मुलीचे नव्हे तर त्याच्या दासीच्या मुलीचे अकबराबरोबर लग्न लावून देण्यात आले होते. राजा भारमाल याने हा विवाह सोहळा आयोजित केला असला, तरी ती राजा भारमलची मुलगी नव्हती. ब्रिटिशांनी आपल्या नायकांचा इतिहास बदलला. सुरुवातीला त्याच इतिहासाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर भारतीयांनीही इतिहास संशोधन केले. मात्र ते सगळेही ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होते. अकबरनामा या ग्रंथात कुठेही या विवाहाचा उल्लेख नाही.
हरिभाऊ बागडे असेही म्हणाले की, महाराणा प्रताप यांनी अकबराला तहासाठी पत्र लिहिले होते, हेही धादांत खोटे आहे. महाराणा प्रताप यांनी कधीही स्वाभिमानाबरोबर तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल जास्त आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते. महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज हे महापुरुष देशभक्तीचे प्रतीक होते. दोघांच्या जन्मतिथीत 90 वर्षांचे अंतर आहे. ते समकालीन असते तर देशाचा इतिहास वेगळा पाहायला मिळाला असता. मात्र, आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात, नवीन पिढीला संस्कृती आणि जाज्ज्वल्य इतिहास शिकवून प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे.
जोधा नावाची (दंत)कथा
जोधा आणि अकबर यांचा विवाहाचा वाद जुनाच आहे. जयपूरजवळच 16व्या शतकात कछवाह (कुशवाह) राजपुतांचे आमेर (अंबर) राज्य अस्तित्वात होते. राजा भारमल हा त्यांचा राजा होता. याच्या मुलीशी राजकीय सोयरिक म्हणून सम्राट अकबराने 1569 साली विवाह केल्याचा दावा केला जातो. अकबरापेक्षा ती पाच वर्षांनी लहान होती आणि पंधराव्या वर्षी तिचा विवाह झाला. तिचे मूळ नाव हरकाबाई असल्याचे सांगितले जाते. नंतर तिला मरियम-उझ-झमानी या नावानेही ओळखले गेले. जोधा राजपूत कन्या राजा भगवतदासाची बहीण व राजा मानसिंग याची आत्या होती, असाही एक प्रवाद आहे. ती अकबराची लाडकी पत्नी असल्याने तिला त्याने हिंदू आचारधर्म पाळण्याची पूर्ण मुभा होती. अकबराला आणखीही राजपूत राण्या होत्या असा, दावा केला जातो. 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला, तर जोधाबाई 1620 पर्यंत जगली. जहाँगीर हा जोधा हिचाच पुत्र समजला जातो. तर जोधा ही अकबराची पत्नी नव्हती, तर सून होती किंवा जोधा नावाचे अकबराच्या काळात कुठलेही व्यक्तिमत्त्वच अस्तित्वात नव्हते, असेही म्हटले जाते.