पाकिस्तान सुधारत नाही! नवे दहशतवादी तळ उभारणार

इस्लामाबाद – पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे १९ दहशतवादी तळ उध्वस्त केले . पण पाकिस्तान हा धडा घेऊनही सुधारत नाही , पाकने पुन्हा नवे दहशतवादी तळ उभारण्याचे आणि ते अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे.

सैन्यदल, आयएसआय आणि अन्य संस्थांच्या मदतीने पाकिस्तान सरकारने युध्द पातळीवर हे काम हाती घेतले आहे. यासाठी पाक सरकारकडून वारेमाप पैसा आणि तांत्रिक मदत पुरवली जात आहे, अशी माहिती गुप्तचर खात्यामधील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे.

७ मे २०२५ रोजी भारतीय हवाईदलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांचे नऊ तळ बॉम्बहल्ले करून उद्ध्वस्त केले. जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा आणि हिजबूल मुजाहिदीन या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांकडून हे तळ भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी वापरले जात होते. यातील भारतीय हवाई दलाने बहावलपूरमधील जैश ए महंमदच्या मुख्यालयावर केलेला हल्ला या संघटनेचे कंबरडे मोडणारा सर्वात मोठा हल्ला होता.
आता हे तळ पुन्हा उभारले जात आहेत. नव्याने उभारण्यात येत असलेले दहशतवादी तळ हे आधीच्या तळांहून अधिक अत्याधुनिक आहेत. याव्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या जंगलात काही छोटे तळही उभारले जात आहेत. भारताच्या रडारला चकवा देणारी आणि लढाऊ विमानांपासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांपासून वाचवणारी अत्याधुनिक यंत्रणा या तळांवर बसवण्यात येत आहे. लुनी, पुटवाल, तैयपू , जमिला, उमरनवाली, छपरार, कहुटा, छोटा छाक आणि जंगलोला आदि ठिकाणी हे तळ उभारले जात आहेत. अंधारातही अचूक वेध घेऊन छायाचित्र टिपू शकणारे थर्मल इमेज कॅमेरे, दाट झुडुपांच्या पलिकडील दृश्य टिपणारी रडार यंत्रणा आणि उपग्रहांद्वारे केल्या जाणारी निगराणीतही तळ सापडणार नाहीत असे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्यदल आणि आयएसआय संयुक्तपणे पाकव्याप्त काश्मीरमधील क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करणार्या १३ तळांचीही पुनर्बांधणी करत आहे. केल, शारदी, दुधनियाल,अथमुकम, जुरा, लिपा खोरे,पाछिबान चम, तांडपानी, नैयाली,जनकोट, चकोटी, निकाईल आणि कहुटा या ठिकाणांचा त्यात समावेश आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सीमेलगतचे दहशतवाद्यांचे काही तळ नव्याने सक्रिय केला जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी लष्करांच्या काही छावण्यांचाही समावेश आहे.जम्मू सेक्टरमध्ये मसरूर बडा भाई, छपरार, लुनी आणि शकरगड येथील ड्रोन केंद्र नव्याने कार्यन्वित केली जात आहेत.

आयएसआयने आता नवी रणनिती आखली आहे. मोठ्या दहशतवादी तळांऐवजी छोटे छोटे तळ उभारण्यावर आयएसआय आता भर देत आहे. मोठे तळ भारताकडून सहज लक्ष्य केले जाऊ शकतात. तसेच मोठ्या तळांवर हल्ला झाल्यास होणारी मनुष्यहानी मोठी असते. त्यामुळे भारताच्या संभाव्य हल्ल्यात कमीत कमी मनुष्यहानी व्हावी,असा आयएसआयचा उद्देश आहे. या प्रत्येक छोट्या तळाची स्वतःची सुरक्षा व्यवस्था असेल. त्याचे नियंत्रण पाकिस्तानी सैन्यदलातील अधिकाऱ्यांकडे असेल.
नुकतीच बहावलपूरमध्ये दहशतवादी संघटनांची एक गुप्त बैठक पार पडली. जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा, हिजबूल मुजाहिदीन आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चे सदस्य आणि आयएसआयचे गुप्तहेर या बैठकीला हजर होते. या संघटनांना लागेल तेवढा पैसा आणि तांत्रिक मदत मिळवून देण्याची ग्वाही आयएसआयच्या गुप्तहेरांना या बैठकीत दिली. त्याचाच भाग म्हणून दहशतवाद्यांच्या तळांची पुनर्बांधणी केली जात आहे. भविष्यात भारतावरील हल्ले अधिक तीव्र करण्याचा कुटिल डाव यामागे आहे.