लंडन- भारताचे तत्कालिन अर्थमंत्री काँग्रेसचे प्रणब मुखर्जी यांनी नोकरकपात टाळण्याचा सल्ला दिल्यामुळे किंगफिशर कंपनी आर्थिक डबघाईला आली, असे मत देश सोडून पळालेला उद्योजक विजय मल्ल्या याने म्हटले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, 2008 साली जागतिक आर्थिक मंदीच्या काळामध्ये किंगफिशर एअरलाईन्स ही कंपनी चालवणे मला जड जात होते. मी ही बाब मुखर्जी यांना सांगितली. विमानांचा ताफा कमी करतो म्हणजे खर्च आटोक्यात येईल असे मी त्यांना वारंवार सांगितले. मात्र प्रणब मुखर्जी यांनी मला कंपनीची उलाढाल कमी करू नको, नोकऱ्या कमी करू नको, असा सल्ला दिला. त्यांनी मला सांगितले होते की, तुम्हाला बँका आर्थिक सहाय्य करतील. मात्र दररोज होत असलेल्या प्रचंड मोठ्या खर्चामुळे अखेर कंपनी तोट्यात गेली.
विजय मल्ल्याने प्रणब मुखर्जी यांच्यावर आरोप करून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पण त्याचे कर्मचारी आणि भारतातील सरकारी बँकांचे अब्जावधी पैसे बुडविल्यावरही तो स्वतः परदेशात अय्याशी करतो आहे. बंगले विकत घेणे, महागड्या गाड्या विकत घेणे हे त्याचे सहजी जीवन सुरू आहे. आता तो असाही आरोप करतो की त्याने सर्व बँकांची मूळ रक्कम परतफेड केली असून, व्याजापोटी बँका त्याच्याकडून पैसे उकळत आहेत. आपण निर्दोष असल्याचे तो वारंवार म्हणतो, पण स्वतः शरण येण्यास तयार होत नाही.
