नवी दिल्ली- देशातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या Scholarship च्या थकीत रकमेबाबत व देशातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या अंत्यत खराब स्थितीवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी PM Narendra Modi यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न Rahul Gandhi यांनी केला आहे. बिहारच्या मागासवर्गीयांच्या वसतीगृहाच्या भेटीचा अनुभव त्यांनी या पत्रात मांडला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील ९० टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्याची विनंती करत आहे. देशातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांची स्थिती दयनीय आहे. मी नुकताच दरभंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाला भेट दिली. तिथे एका रुममध्ये सहा ते सात विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबण्यात येते. तिथल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. जेवणाची सोय नाही. तिथे ग्रंथालय व इंटरनेटची सुविधा नाही. दुसरे असे की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकनंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आलेली नाही. बिहारमध्येच गेल्या तीन वर्षांपासून हे Scholarshipचे ऑनलाईन पोर्टल काम करत नाही. या विद्यार्थ्यांना २०२१-११ पासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. सध्या शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अर्ध्यावर आली आहे. अशीच परिस्थिती देशाच्या अनेक भागांमध्ये आहे. माझी तुमच्याकडे मागणी आहे की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांचे ऑडीट व्हावे. चांगल्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, जेवण व शिक्षणाच्या सुविधा देण्यात याव्यात. मॅट्रिकनंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम वेळेवर देण्यात यावी. पत्राच्या शेवटी राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, मला खात्री आहे की, तुम्हीही सहमत असाल की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रगतीशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. त्यामुळे या पत्रावर आपण सकारात्मक निर्णय घ्यावा. राहुल गांधी यांच्या पत्राला आता पंतप्रधान काही उत्तर देतात का हे पाहावे लागणार आहे.