प्रयागराज –उत्तर प्रदेशात झालेल्या महाकुंभासाठी प्रयागराज (Prayagraj Mahakumbh) येथे कोट्यवधी रुपये खर्चून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या होत्या. मात्र यातील ४२ टक्के रस्ते गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण ठरले आहेत. याशिवाय अनेक नाल, पादचारी मार्ग (footpaths), विजेच्या कामांमध्येही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. उच्चस्तरीय चौकशीच्या तपासणी अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार (corruption) झाल्याचा आरोप होत आहे.
कुंभमेळ्यासाठी बांधलेल्या १०३ रस्त्यांची तपासणी करण्यात आली. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रयागराज विकास प्राधिकरण आणि महापालिका यांनी बांधले आहेत. या रस्त्यांसाठी जवळपास १,००० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हे रस्ते प्रयागराजमधील कुंभस्नानात येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आले होते. मात्र, कुंभमेळ्याच्या तयारीच्या अगोदरच या रस्त्यांवर खड्डे, भेगा पडायला सुरुवात झाली होती. ते खडबडीत होते. याबाबत स्थानिक नागरिक आणि काही जागरूक संस्थांनी याच्या तक्रारी केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी एप्रिलमध्ये लेखापरीक्षणाचे आदेश दिले.
या तक्रारीनंतर आयुक्त पंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या २० पथके नेमून रस्त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. नंतर मुख्य विकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या पथकात दोन अतिरिक्त आयुक्त व दंडाधिकाऱ्यांची भर घालण्यात आली. मात्र, अहवाल सादर करण्यात विलंब झाल्यामुळे या पथकांना कालावधी वाढवून देण्यात आला. आता अंतिम अहवाल जवळजवळ पूर्ण झाला असून त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत.
चौकशीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी केलेल्या रस्त्यांपैकी जवळपास ४२ टक्के रस्ते बांधकामाच्या दृष्टीने निकृष्ट ठरले आहेत. नैनी, झूंसी, फाफामऊ व अन्य परिसरातील रस्त्यांची स्थिती सर्वात वाईट असून, हे रस्ते वापराआधीच आधीच खराब होण्यास सुरुवात झाली होती. इतर अनेक शहरातील रस्तेही गुणवत्ता चाचणीत नापास झाले आहेत. महाकुंभदरम्यान येणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करता हे रस्ते टिकाऊ असायला हवे होते. परंतु बहुतेक रस्ते प्राथमिक चाचणीतही नापास झाले, असे चौकशीत सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रस्त्यांव्यतिरिक्त नाल्यांचे काम, पादचारी मार्ग, आणि वीज केबलिंगसारख्या संबंधित पायाभूत प्रकल्पांमध्येही गंभीर त्रुटी आढळून आल्या. अनेक प्रकल्प अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत किंवा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे.