अफगाणिस्तानने कुणार नदीवर (Kunar River) नवीन धरणे बांधण्याची योजना आखल्यामुळे पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखला जाण्याची शक्यता आहे. ही कृती भारताच्या जल धोरणाप्रमाणेच (India water policy) असल्याचे जाणकारांचे मत आहे.
भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी रोखण्यात आले होते.
बलुच कार्यकर्ते मीर यार बलुच (Mir Yar Baloch) यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली की, “भारताप्रमाणेच आता अफगाणिस्तानदेखील पाकिस्तानमध्ये पाणी जाण्यापासून अडथळा आणणार आहे.” त्यांनी दावा केला की, तालिबानचे जनरल मुबीन यांनी अलीकडेच कुणार भागाला भेट देऊन प्रस्तावित धरण स्थळाची पाहणी केली असून त्यांनी काबुल सरकारला निधी उभारण्याचे आवाहन केले आहे.
जनरल मुबीन यांच्या म्हणण्यानुसार, “हे पाणी आमचं रक्त आहे. आम्ही ते गमावू शकत नाही. आम्ही आमचं पाणी थांबवणार आहोत जेणेकरून विजेची गरज पूर्ण करता येईल आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल.”
कुणार नदी हिंदूकुश पर्वतरांगेतून उगम पावते आणि काबुल नदीला मिळते, जी पुढे पाकिस्तानात जाते. या नदीवर कोणताहीऔपचारिक जलवाटप करार नसल्यामुळे अफगाणिस्तानच्या निर्णयाचा पाकिस्तानच्या खालच्या बाजूच्या शेतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर, भारताने याआधीच अफगाणिस्तानात शहतूत धर उभारण्यास सुरुवात केली असून यासाठी 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला जात आहे. हे धरण काबुल शहरातील 20 लाख लोकांना पिण्याचे पाणी आणि 4,000 हेक्टर जमिनीला सिंचनपुरवठा करणार आहे. 15 मे रोजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तालिबान-नियुक्त परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत या प्रकल्पावर चर्चा केली होती.
भारताच्या यापूर्वीच्या प्रकल्पांमुळे, जसे की २०१६ मध्ये सुरू झालेले सलमा धरण, आणि सध्या सुरू असलेले किशनगंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्प, ज्यामुळे सिंधू जल करारांतर्गत काही विशिष्ट काळात पाकिस्तानसाठी पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे.