नवी दिल्ली- यंदाची अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) ३ जुलैपासून सुरू होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. यात्रेच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार जम्मू-काश्मीर प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या निर्णयांनुसार, पहलगाम आणि बालताल एक्सप्रेस मार्गावर हवाई वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले असून, संपूर्ण यात्रामार्गाला ‘नो फ्लाय झोन’ (No flying zone)म्हणून घोषित करण्यात आले आहे.
केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने पहलगाम आणि बालटाल मार्गांसह सर्व अमरनाथ यात्रा मार्गांना ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून घोषित केले आहे. पहलगाम आणि बालटाल (Pahalgam and Baltal) मार्गांवर सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांना ही बंदी लागू आहे. यूएव्ही, ड्रोन आणि फुगे यांचा या बंदीमध्ये समावेश असणार आहे. ही सुरक्षा सूचना १ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत लागू असेल.