Amitabh Bachchan Caller Tune | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर क्राईम जनजागृतीसाठीची कॉलर ट्यून (Amitabh Bachchan Caller Tune) केंद्र सरकारने आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मोबाईल कॉलपूर्वी 40 सेकंद वाजणारी ही ट्यून आता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. वाढत्या तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीत होणारा विलंब लक्षात घेऊन संचार मंत्रालयाने (Ministry of Communications) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कॉलर ट्यून का सुरू झाली होती?
सायबर फसवणूक (Cyber Fraud) आणि डिजिटल फ्रॉडच्या (Digital Fraud) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना प्रत्येक कॉलपूर्वी जनजागृती संदेश वाजवण्याचे निर्देश दिले होते. या संदेशात अमिताभ बच्चन यांच्या प्रभावी आवाजात लोकांना फिशिंग, बनावट कॉल्स आणि अनोळखी लिंक किंवा OTP शेअर न करण्याचा सल्ला दिला जात होता. सुरुवातीला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले, कारण दररोज हजारो लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत होते. मात्र, 40 सेकंदांचा हा संदेश, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत कॉल करताना, लोकांना त्रासदायक वाटू लागला.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर लोकांनी ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली होती. अनेकांनी याला “त्रासदायक” आणि “अनावश्यक विलंब” होण्याचे कारण ठरवले
या कॉलर ट्यूनवरून सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना काही युजर्सनी ट्रोल केले होते. एका युजरने त्यांना “फोनवर बोलणे बंद करा ” असे लिहिले होते. यावर बिग बींनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देत म्हटले, “सरकारला सांगा, त्यांनी सांगितले म्हणून आम्ही केले.” त्यांच्या या मजेदार उत्तराची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली आणि त्याचे कौतुकही झाले.
सायबर जनजागृतीसाठी नवे पर्याय?
सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी ही कॉलर ट्यून सरकारच्या डिजिटल सुरक्षा मोहिमेचा महत्त्वाचा भाग होती. आता ही ट्यून बंद झाल्याने सरकार नव्या पर्यायांवर विचार करत आहे. तज्ञांच्या मते, कमी वेळेचे संदेश किंवा वैकल्पिक जागरूकता मोहिमा यापुढे सुरू होऊ शकतात. सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सरकार आणि टेलिकॉम कंपन्या यापुढेही सक्रिय राहतील, अशी अपेक्षा आहे.