लंडन- अहमदाबादहून लंडनला जाणारे एयर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्या ब्रिटीश नागरिकांचे चुकीचे मृतदेह सोपवल्याचा दावा दोन मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी तपास करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
एयर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन विमानाला झालेल्या अपघातात विमानातील एक प्रवासी वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये १२ ब्रिटीश नागरिकांचा समावेश होता. अपघातानंतर विमानाला आग लागली. आगित होरपळल्याने मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण गेले. डीएनए नमुन्यांच्या सहाय्याने या मृतदेहांची ओळख पटवण्यात आली होती. ब्रिटीश नागरिकांच्या मृतदेहांचे अवशेष केन्यन्स इंटरनॅशनल एमर्जन्सी सर्विसेसच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते.
केंद्र सरकारचे अधिकृत प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, चुकीचे मृतदेह मिळाल्याचा अहवाल आमच्याकडे आला आहे. सर्व मृतदेह आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल व मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करत जतन करण्यात आले होते. या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले असल्यास त्यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून तोडगा काढण्यात येईल.
