अमरनाथ यात्रेसाठी ड्यूटीवर जाणाऱ्या BSF जवानांना दिली खराब ट्रेन, 4 रेल्वे अधिकारी निलंबित

BSF Amarnath Yatra Train Controversy

BSF Amarnath Yatra Train Controversy | अमरनाथ यात्रेसाठी त्रिपुरातील उदयपूर येथून जम्मूकडे निघालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना खराब आणि घाणेरड्या अवस्थेतील ट्रेन (Amarnath Yatra Train Controversy) देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 9 जून रोजी ही ट्रेन उदयपूरहून निघाली होती, परंतु तिची दुरवस्था पाहून जवानांना धक्का बसला. यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले असून, काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आता या प्रकरणी सरकारने मोठी कारवाई करत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ कारवाई करत अलिपूरद्वार रेल्वे विभागातील तीन वरिष्ठ सेक्शन इंजिनियर्स आणि एक कोचिंग डेपो अधिकाऱ्याला निलंबित केले. बीएसएफच्या तक्रारीनंतर जवानांना तातडीने दुसरी विशेष ट्रेन उपलब्ध करून देण्यात आली. या नव्या ट्रेनने जवानांनी उदयपूरहून जम्मूसाठी प्रवास सुरू केला.

ट्रेनची दुरवस्था आणि व्हायरल व्हिडिओ

बीएसएफने लांबच्या प्रवासासाठी दोन एसी 2-टियर, दोन एसी 3-टियर, 16 स्लीपर कोच आणि 4 जीएस/एसएलआर कोच अशी विशेष ट्रेन व्यवस्था मागितली होती. ही ट्रेन त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमधील चार ठिकाणी जवानांना घेण्यासाठी थांबणार होती. मात्र, प्रत्यक्षात आलेली ट्रेन अत्यंत वाईट अवस्थेत होती. तुटलेली दरवाजे, खराब झालेल्या खिडक्या, निकामी विजेच्या फिटिंग्ज आणि अस्वच्छ शौचालयांनी जवानांचा प्रवास कठीण झाला.

या परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादाला आणखी तोंड फुटले. काँग्रेसने देखील या घटनेचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर टीका केली होती.

ईशान्य सीमा रेल्वे (एनएफआर) झोनने या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले, “बीएसएफ जवानांना खराब ट्रेन देण्याचा आरोप चुकीचा आहे. सर्व कोचेसची देखभाल, दुरुस्ती आणि साफसफाई केल्यानंतरच प्रवासासाठी दिले जातात. व्हायरल व्हिडिओ हा दुरुस्तीसाठी पाठवण्यात येणाऱ्या कोचचा आहे, जो जवानांसाठी नव्हता.” तरीही, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे रेल्वेने सांगितले.

अमरनाथ यात्रेचे महत्त्व आणि सुरक्षा व्यवस्था

दरम्यान, 38 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा 9 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे. या यात्रेसाठी केंद्र सरकारने 581 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कंपन्या तैनात केल्या आहेत, ज्यात सुमारे 42,000 कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी असतील.