पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडली का ? सीडीएस अनिल चौहान उत्तर देत म्हणाले…

CDS General Anil Chauhan

CDS General Anil Chauhan | ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान भारताची लढाऊ विमानं पाडल्याचा दावा पाकिस्तानने (Pakistan) वारंवार केला होता. मात्र, भारताकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान (General Anil Chauhan) यांनी सिंगापूरमध्ये झालेल्या शांग्री-ला डायलॉगमध्ये (Shangri-La Dialogue) या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य करत माहिती दिली.

ब्लूमबर्गला (Bloomberg) दिलेल्या मुलाखतीत जनरल चौहान म्हणाले, “जेट पाडले गेले का यापेक्षा ते का पाडले गेले हे अधिक महत्त्वाचं आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, कोणतंही नुकसान झालं तरी त्यातून शिकून पुढे जाणं हीच खरी बाब आहे.

पाकिस्तानकडून राफेलसह (Rafale) 6 भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा जो दावा करण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना जनरल चौहान म्हणाले, “तो दावा पूर्णपणे खोटा आहे.” त्यांनी सांगितलं की, “महत्त्वाचं हे नाही की विमान पडलं की नाही, तर त्यामागचं कारण काय होतं, आणि त्यानंतर आपण काय केलं.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही आमची रणनीतिक चूक ओळखली, सुधारली आणि दोन दिवसांतच आमच्या सर्व विमानांनी पुन्हा उड्डाण घेतले.लांबच्या लक्ष्यांवर पुन्हा प्रभावी हल्ले केले.”

दरम्यान, याआधी 11 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती यांनीही याच मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांनी सांगितलं होतं की, “संघर्ष असतो तिथे नुकसान होतंच. पण मुख्य प्रश्न हा विचारला पाहिजे की, आम्ही आमचं उद्दिष्ट म्हणजे दहशतवादी तळउद्ध्वस्त करण्याचं गाठलं का? आणि त्याचं उत्तर ठाम ‘होय’ आहे.”