हृदयद्रावक! मुलं किंचाळत राहिली, मात्र बापाने घट्ट पकडून ठेवले; वडिलांनी चिमुकल्यांसह ट्रेनखाली उडी घेत केली आत्महत्या

Faridabad Train Accident

Faridabad Train Accident | दिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये (Faridabad) एका हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. एका 45 वर्षीय व्यक्तीने आपल्या चार लहान मुलांसह धावत्या ट्रेनखाली (Train Accident) येऊन आत्महत्या केली. 3 ते 9 वर्षे वयाच्या या मुलांनी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना घट्ट पकडले आणि गोल्डन टेंपल एक्सप्रेस ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली.

मनोज महतो असे या व्यक्तीचे नाव असून, तो मूळचा बिहारचा (Bihar) रहिवासी होता. त्याच्या पत्नी प्रियासोबतसततच्या भांडणांमुळे तो तणावाखाली होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मनोजला आपल्या पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय होता, ज्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यांच्यातील भांडणानंतर मनोज आपल्या चार मुलांना, पवन (10), कारू (9), मुरली (5) आणि छोटू (3) यांना पार्कमध्ये घेऊन जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, पार्कऐवजी त्याने मुलांना रेल्वे रुळांजवळ नेले. जाताना त्याने मुलांसाठी चिप्स आणि कोल्ड्रिंक्स विकत घेतले.

रेल्वे रुळांजवळील एका फ्लायओव्हरखाली मनोज आणि त्याची मुले सुमारे एक तास थांबली. गोल्डन टेंपल एक्सप्रेस ट्रेन येताच, मनोजने चारही मुलांना घट्ट पकडून रुळांवर उभे राहिले, असे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी मुलांचे किंचाळणे ऐकले, पण मनोजने त्यांना सोडले नाही. ट्रेनने पाचही जणांना चिरडले, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मनोज दोन मुलांना खांद्यावर घेऊन आणि इतर दोघांचा हात धरून रेल्वे रुळांवरून चालत होता. ट्रेनच्या पायलटने इशारा देऊनही तो हलला नाही.

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह हटवले आणि तपास सुरू केला. मनोजच्या खिशात एक चिठ्ठी (Note) सापडली, ज्यात त्याच्या पत्नीचा फोन नंबर होता. रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनोजला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय होता, आणि हेच त्याच्या या टोकाच्या पावलामागील कारण असावे. पोलिसांनी पत्नीला घटनास्थळी बोलावले, पण मृतदेह पाहून ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, मनोजच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत.