दिसपूर – आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) विहिरीत गॅस गळती चौथ्या दिवशीही सुरूच राहिली. त्यामुळे ७० कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. शनिवारी विहीर क्रमांक आरडीएस १४७ मधून गॅस गळती सुरु झाली होती. त्यानंतर लगेच विहीरीचे ऑपरेशनल नियंत्रण ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही विहीर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही यासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे एकत्रित केली आहेत. संकट व्यवस्थापन पथक (सीएमटी) गळती नियंत्रित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. या विहिरीत अद्याप आग लागलेली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानीही झालेली नाही. ही गॅस गळती १२ जून रोजी भाटियापारच्या बारीचुक येथीलओएनजीसीच्या रुद्रसागर तेल क्षेत्राच्या रिग क्रमांक एसकेपी १३५ च्या विहीर क्रमांक आरडीएस १४७अ मध्ये झाली. एसके पेट्रो सर्व्हिसेस ही एक खाजगी कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनीच्या वतीने विहीर चालवत होती.
जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेमुळे सुमारे १,५०० लोक बाधित झाले आहेत. या परिसरात गॅसचा वास येत असून ते रहिवासी स्टोव्ह किंवा गॅस पेटवू शकत नाहीत. आम्ही त्यांना शिजवलेले अन्न पुरवत आहोत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत.
जिल्हा प्रशासनाने फेसबुकवर सांगितले की,या परिसरातील ७० कुटुंबांना जवळच्या बाणगाव येथे उभारलेल्या मदत शिबिरात हलवण्यात आले आहे. त्यांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत. सध्या आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर घटनास्थळी उपस्थित आहेत. ते स्थानिक रहिवासी आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची तपासणी आहेत.