…त्यामुळे आपली सर्वोत्तम लोक देश सोडत आहेत, हवाई दल प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

Air Chief Marshal Amar Preet Singh

Air Chief Marshal Amar Preet Singh | भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह (Air Chief Marshal Amar Preet Singh) यांनी भारताच्या संरक्षण संशोधन क्षेत्रात उच्च दर्जाच्या प्रतिभेला टिकवून ठेवण्यात होणाऱ्या अपयशावर तीव्र चिंता व्यक्त केली. CII वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2025 मध्ये ते बोलत होते.

अनेक हुशार व तज्ञ लोकं भारत सोडून जात आहेत व दुसऱ्या देशात काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, अशा लोकांना भारतात टिकवून ठेवण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

त्यांनी स्पष्ट केलं की, “कामासाठी आपल्याला सर्वोत्तम लोक मिळत नाहीत. कारण अनेक कुशल व्यावसायिक परदेशात स्थलांतर करत आहेत. या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी त्यांना चांगले वेतन, सन्मान आणि चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

“फक्त प्रोत्साहन नव्हे तर पोषक वातावरण हवे असते. जेव्हा उत्तम वातावरण मिळते, तेव्हाच उत्तम लोक काम करतात. आपल्याला देशातच ही ऊर्जा निर्माण करावी लागेल,” असे सिंह म्हणाले.

यावेळी बोलताना सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर देखील भाष्य केले. “सर्व यंत्रणा आणि दलांनी एका उद्देशाने एकत्र काम केलं आणि त्यामुळे हे शक्य झालं. आपण फक्त उपकरणे विकत घेणारे नसून, ती तयार करणारे देश व्हावे लागेल,” असं त्यांनी अधोरेखित केलं.

हवाई दल प्रमुखांनी स्पष्ट इशारा दिला की, भविष्यासाठी नाही तर “आता तयार” राहण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यांनी मेक इन इंडिया अंतर्गत तातडीने अंमलबजावणी होणाऱ्या प्रकल्पांची आवश्यकता सांगितली. तसेच, यावेळी त्यांनी संरक्षण प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसल्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली.