‘एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झालेला नाही…’, संरक्षण प्रकल्पांमधील दिरंगाईवर हवाई दल प्रमुखांची तीव्र नाराजी

Air Chief Marshal A.P. Singh

Air Chief Marshal A.P. Singh | ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर बोलताना भारतीय हवाई दलाचे ( IAF) प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह (Air Chief Marshal A.P. Singh) यांनी संरक्षण क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या सततच्या विलंबावर आणि विशेषतः लढाऊ विमानांच्या वितरणातील अडथळ्यांवर भाष्य केले आहे. संरक्षण साहित्य वेळेवर मिळत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

स्वदेशी बनावटीच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “हे विमान समकालीन तंत्रज्ञानाला साजेसं असावं, कालबाह्य होऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की AMCA ला “पाचवी पिढी” असे टॅग लावण्यात अर्थ नाही, कारण ते बाहेर येईल तेव्हा त्याची पिढी ठरेल.

भारतीय उद्योग परिसंघाच्या वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत बोलताना सिंह म्हणाले की, “हवाई शक्ती ही भूदल व नौदल यांच्यासाठी अनिवार्य घटक आहे. कोणतेही ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी ती आवश्यकच आहे.” ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत त्यांनी अभिमानाने सांगितले, “हे केवळ व्यावसायिक नव्हे तर मिशन मोडमध्ये पार पडलेलं ऑपरेशन होतं, जिथे प्रत्येक एजन्सीने आपली भूमिका उत्कृष्ट बजावली.”

सिंह यांनी नमूद केले की “हवाई शक्तीबाबत केवळ देशांतर्गत उत्पादन पुरेसे नाही. आपल्याला डिझाइनपासून विकासापर्यंत सर्व टप्पे भारतातच पार पाडायला हवेत”

कालमर्यादांची समस्या आणि सरकारी प्रक्रिया

यावेळी बोलताना तेजस एमके-1ए करारासंदर्भात सिंह यांनी चिंता व्यक्त केली. “2021 मध्ये स्वाक्षरी झालेल्या कराराची अद्यापही वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही, यावर आपण गांभीर्याने विचार करायला हवा. एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झाल्याचं आठवत नाही,” असं ते म्हणाले. वेळेच्या व्यत्ययामुळे संरक्षण क्षेत्रात विश्वास कमी होत असल्याची सूचनाही त्यांनी केली.

सिंह यांनी सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातील संवादाचा हवाला देत सांगितले की, “एकदा कमिटमेंट दिली, की ती पूर्ण झालीच पाहिजे.” त्यांनी चर्चिल यांच्या प्रसिद्ध वाक्याचाही उल्लेख करत खाजगी क्षेत्राला पुढे येण्याचं आवाहन केलं. “तुमच्याकडे ही सर्वोत्तम वेळ आहे. कृपया नेतृत्व घ्या, उत्पादन क्षमता दाखवा, भलेही नफा कमी मिळाला तरीही चालेल” असे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना सिंह म्हणाले की, “हे ऑपरेशन दाखवून देतं की युद्ध आता कोणत्या दिशेने जात आहे. आपल्याला आता तयार राहावं लागेल. जर आपण आज आवश्यक असलेल्या गोष्टी उद्यावर टाकल्या, तर भविष्यात तयार होणं कठीण होईल. यासाठी तातडीने काही ‘मेक-इन-इंडिया’ प्रकल्प हाती घ्यावे लागतील.”

त्यांनी शेवटी सांगितले की, “हवाई दल संयमी राहिलं आहे, परंतु संयम अनंत काळासाठी असू शकत नाही. आपण रबर ताणू, पण तो तुटू नये, हे बघावं लागेल.”, असे म्हणत त्यांनी संरक्षण साहित्य मिळण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.