Maharashtra Corona Active Cases | भारतासह जगभरातील अनेक देशाने पुन्हा एकदा कोव्हिड-19 ने डोके वर काढले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या आता 3,000 च्या पुढे गेली आहे. सध्या देशात 3,395 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सर्वाधिक 1,336 रुग्ण केरळमध्ये (Kerala) आहेत. यानंतर महाराष्ट्रामध्ये 467 आणि दिल्लीत 375 रुग्ण उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 685 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूची नोंद दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या संसर्गाची तीव्रता तुलनेत कमी आहे आणि बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणा सतर्क
22 मे रोजी देशात केवळ 257 सक्रिय रुग्ण होते, पण 26 मेपर्यंत हा आकडा 1,010 वर गेला आणि आता तो 3,395 वर पोहोचला आहे. मात्र, यामुळे घाबरण्याचे कारण नाही, कारण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
नवीन आकडेवारीनुसार, सध्या केरळमध्ये (Kerala) सर्वाधिक 1,336 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 467, दिल्लीत 375, गुजरातमध्ये 265, कर्नाटकमध्ये 234, पश्चिम बंगालमध्ये 205, तामिळनाडूमध्ये 185 आणि उत्तर प्रदेशात 117 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे ICMR) महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, जीनोम सिक्वेन्सिंगच्या आधारे सध्या वाढत असलेल्या संक्रमणासाठी जबाबदार असलेले व्हेरियंट हे ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट्स आहेत. त्यात मुख्यत्वे LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 यांचा समावेश आहे, मात्र हे व्हेरियंट गंभीर स्वरूपाचे नाहीत.
डॉ. बहल म्हणाले, “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सध्या काळजी करण्याची गरज नाही. मात्र, सतर्क राहणे गरजेचे आहे.”