भारताकडे आता पाकिस्तानपेक्षा जास्त अणुबॉम्ब, समोर आला अण्वस्त्र साठ्याचा आकडा

India Nuclear Warheads

India Nuclear Warheads | भारत-पाकिस्तान, इराण-इस्त्रायल संघर्षामुळे सातत्याने अणुबॉम्बची सातत्याने चर्चा होत आहे. आता या देशांकडे किती अणुबॉम्ब आहेत, याचा आकडा समोर आला आहे. भारताने अणुशस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तानला मागे टाकले आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) ताज्या अहवालात याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे आता 180 अणुबॉम्ब असून, पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत. गेल्या वर्षी भारताने आपला अणुशस्त्र साठा 172 वरून 180 पर्यंत वाढवला, तर पाकिस्तानच्या शस्त्रागारात कोणताही बदल झालेला नाही.

SIPRI च्या अहवालात म्हटले आहे की, भारताने केवळ अणुबॉम्बांची संख्या वाढवली नाही, तर नवीन वितरण प्रणालीविकसित करण्यावरही भर दिला आहे. यामध्ये कॅनिस्टराईज्ड क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, जी भविष्यात अनेक अणुबॉम्ब वाहून नेऊ शकतात आणि शांततेच्या काळातही तैनात राहू शकतात. यामुळे भारताला अधिक विश्वासार्ह आणि टिकाऊ ‘सेकंड-स्ट्राइक कॅपॅबिलिटी’ मिळत आहे.

दुसरीकडे, पाकिस्ताननेही नवीन वितरण प्रणाली काम केले आहे, पण त्यांच्या अणुबॉम्बच्या आकडेवारीत गेल्या वर्षभरात कोणतीही वाढ झालेली नाही. भारताच्या हवाई, सागरी आणि जमिनीवरील क्षमतांमधील गुंतवणुकीमुळे त्यांना पाकिस्तानच्या मर्यादित तिन्ही प्लॅटफॉर्मच्या तुलनेत आघाडी मिळाली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संदर्ष वाढला आहे. त्यानंतरचा SIPRI चा हा अहवाल समोर आला आहे, ज्याने भारताच्या वाढत्या सामरिक शक्तीवर प्रकाश टाकला आहे.

दरम्यान, SIPRI ही 1966 मध्ये स्थापन झालेली स्वतंत्र संस्था असून, ती शस्त्र नियंत्रण, संघर्ष आणि निःशस्त्रीकरणावर संशोधन करते. अहवालानुसार, रशिया (5,459 अणुबॉम्ब) आणि अमेरिका (5,177 अणुबॉम्ब) हे अणुशस्त्रांच्या बाबतीत आघाडीवर आहेत. तसेच, सिप्रीच्या रिपोर्टनुसार, 2020-24 मध्ये 162 देशांनी मोठ्या शस्त्रांची आयात केली, यात भारत, युक्रेन, कतार, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान हे टॉप-5 देश होते. या देशांनी जागतिक शस्त्र आयातीच्या 35% वाटा उचलला.