देहराडून – केदारनाथमध्ये रविवारी १५ जून रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर (Helicopter accident) दोन दिवस बंद ठेवलेली चारधाम यात्रा (Char Dham Yatra 2025) हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या अपघातात पाच भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तराखंड सरकारने हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती थांबवली होती.
उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (UCADA) सीईओ सोनिका यांनी सांगितले की, आता हेलिकॉप्टर सेवा नागरी विमान वाहतूक महासंचालनालया च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू करण्यात आली आहे. पायलट व ऑपरेटरच्या उड्डाण अनुभवाची चौकशी केली जाईल. नियमभंग झाल्यास कडक कारवाई होईल. हवामान पाहूनच उड्डाणाचा निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांनी यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत कमांड अॅण्ड कोऑर्डिनेशन सेंट स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की , श्रद्धाळूंच्या सुरक्षित, सोयीस्कर प्रवासासाठी सरकार कटिबद्ध आहे. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातांच्या वाढत्या घटनांवर उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेत सरकारकडे स्पष्टीकरण मागवले आहे. गेल्या दोन महिन्यांत विविध अपघातांत १३ जणांचा मृत्यू झाला आहे