वारसदार नाही! मायावती आपल्या भूमिकेवर ठाम, आकाश आनंदला पक्षात पुन्हा संधी पण उत्तराधिकार नाही

Mayawati accepts Aakash Anand's public apology

Mayawati accepts Aakash Anand’s public apology | बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातून काढून टाकलेले पुतणे आकाश आनंद (Aakash Anand) यांना पुन्हा पक्षात स्थान दिले आहे. आकाश यांनी सोशल मीडियावर सार्वजनिक माफी मागितल्यानंतर केवळ काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला. मात्र, यावेळी मायावतींनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षासाठी काम करण्याची संधी दिली जात आहे, पण कोणत्याही प्रकारे राजकीय वारसदार (Political Successor) मानण्याचा विचार नाही.

सोशल मीडियावर माफी, मायावतींचा पुनर्विचार

आकाश आनंद यांनी ‘एक्स’ (X) या प्लॅटफॉर्मवर माफीनामा प्रसिद्ध करत आपल्या चुका मान्य केल्या. त्यांनी लिहिलं की, “मी माझ्या सासरच्या लोकांच्या हस्तक्षेपाशिवाय (without interference) पक्षासाठी काम करेन.” त्यानंतर मायावतींनीही ‘एक्स’ वर पोस्ट करत सांगितले की, “ज्येष्ठ नेत्यांचा आदर करण्याचे आणि सासऱ्यांच्या प्रभावाखाली न येण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, त्यामुळे त्यांना आणखी एक संधी देण्यात येत आहे.”

मायावती म्हणाल्या, “मी अजूनही पूर्णतः निरोगी आहे. त्यामुळे मी स्वतःच पक्ष आणि चळवळीसाठी काम करत राहणार आहे. त्यामुळे वारसदार बनवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी याबाबत पूर्वी घेतलेल्या भूमिकेवर ठाम आहे.”

मायावतींनी हेही स्पष्ट केलं की, आकाश आनंद यांना माफ करण्यात आलं असलं, तरी त्यांच्या सासऱ्यांबाबत मत बदललेलं नाही.

मायावतींनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ (Ashok Siddharth) यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत लिहिलं की, “त्यांनी गटबाजी आणि इतर वाईट मार्गांनी केवळ पक्षाचं नुकसान केलं नाही, तर आकाशचंही राजकीय आयुष्य उध्वस्त केलं. त्यामुळे त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही.”

दरम्यान, माफी मागताना आकाश आनंद यांनी मायावती यांना “एकमेव राजकीय गुरू आणि आदर्श” म्हणत आपली पूर्ण निष्ठा व्यक्त केली. त्यांनी लिहिलं, “मी खात्री देतो की कोणत्याही नातेसंबंधामुळे माझं काम अडथळले जाणार नाही. मी कोणत्याही निर्णयात सल्लागारांचा हस्तक्षेप होऊ देणार नाही.”

एक महिन्यांपूर्वी पक्षाबाहेर, आता पुन्हा प्रवेश

सुमारे एक महिना आधी मायावतींनी आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकले होते. त्यावेळीही त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्या हयातीत कोणताही राजकीय वारसदार (Political Heir) पक्षात नसेल. त्याआधी त्यांना राष्ट्रीय समन्वयकपदासह इतर सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या होत्या.